कुठलेही शैक्षणिक यश मिळवताना त्यासाठी पैसा आणि अन्य सोयी सुविधा असल्या पाहिजे असे नाही. शिक्षणाची इच्छा असली आणि परिस्थितीची जाणीव असेल आणि आई-वडिलांचा आधार नसेल तरी सामान्य राहून शिक्षण घेता येऊ शकतो. आई-वडिलांचे प्रेम नाही आणि तरी सामान्यांच्या बरोबरीने किंवा त्याहीपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवणारी अनेक मुले समाजात आहेत. नागपुरातील प्लॅटफार्म शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि विमलाश्रमातील विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेत शैक्षणिक क्षेत्रात केलेली कामगिरी अनेकांना आदर्श ठरणारी आहे.
उदयनगर भागात असलेल्या विमलाश्रमात राहणाऱ्या छकुली बारापात्रे आणि जया भाटी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे ६४ आणि ६१ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. याच आश्रमातील मेघा राजन सिंग हिला ८७ टक्के गुण मिळाले आहे.
गोळीबार चौक येथे राहणाऱ्या छकुलीच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी छकुलीसह तिच्या लहान बहिणीला रामभाऊ इंगोले यांच्या विमलाश्रमात आणून दिल्यावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्या दोघी आश्रमामध्ये राहतात. छकुली आश्रमात आली त्यावेळी ती सातवीत होती. जया भाटी ही सुद्धा २०१२ मध्ये तीन बहिणी आणि लहान भावासह विमलाश्रमात आले. वडील गेल्यानंतर आईने चारही मुलांना सोडून दिले.
त्यामुळे मावशीने काही दिवस ठेवल्यानंतर तिनेही मुलांना सोडून दिले होते. मात्र, रामभाऊ इंगोले यांनी चारही मुलांचा स्वीकार केला आणि त्यांना आश्रमात आणले. त्यातील मोठी मुलगी जया ही दहावीत असून तिला ६१ टक्के गुण मिळाले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी यश मिळवल्यानंतर आईवडिलांकडून जे कौतुक केले जाते ती कौतुकाची थाप मात्र त्यांच्या पाठीवर पडणारी नसली तरी रामभाऊंनी त्याचे कौतुक केले. मेघा सिंग ही पिंकी सिंगची मुलगी आहे. पिंकी ही विमलाश्रमात राहत असताना त्या ठिकाणी तिने शिक्षण घेतले.
तिचा विवाह झाला आणि तिची मुलगी मेघा ही सुद्धा विमलाश्रमात राहत असताना तिने हे यश मिळवले. मेघाला डॉक्टर व्हायचे आहे. जया आणि छकुली या पाचगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या.
छकुलीला वकील व्हायचे आहे, तर जयाला प्रशासकीय अधिकारी होऊन समाजाची सेवा करायची आहे.

मुलांची गाडी रुळावर आली
सिकंदराबादमधून वयाच्या दहाव्या वर्षी पळून आलेला रेल्वे प्लॅटफॉर्म निवासी शाळेत राहणारा दत्तात्रय चौधरी या विद्यार्थ्यांला ५० टक्के गुण मिळाले आहे. रेल्वेस्थानकावर भीक मागणारी, काम करणारी मुले पाहून रेल्वे विभाग आणि महापालिकेने प्लॅटफॉर्म शाळा केली आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर भटकणाऱ्या मुलांची गाडी रुळावर आली. त्या भटकणाऱ्या मुलांमघील एक विद्यार्थी म्हणजे दत्तात्रय चौधरी.
रेल्वे प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांवर श्रीकांत आगलावेने त्यांच्यावर मायेची पाखर केली आणि व्यसन, चोरीच्या आहारी गेलेल्या मुलांच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न पेरले गेले. हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दृष्टीने एकएक पाऊल पुढे सरकत आहेत. विजयवाडामध्ये राहणाऱ्या दत्तात्रयच्या वडिलांचे तो लहान असताना निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने काही वर्षे सांभाळ केल्यानंतर त्याला सिकंदराबादमधील एका वसतिगृहात ठेवले. मात्र त्या ठिकाणी होणारे रॅगिंग आणि त्याचा होत असलेला छळ बघता तो वसतिगृहातून पळून मुंबईला आला.
दादरला रेल्वेस्थानकावर गाडीमध्ये साफसफाई करीत होता. रेल्वेस्थानकावर फिरणाऱ्या एका भंगार वेचणाऱ्याच्या हाती तो लागला.
तो या मुलाला घरी घेऊन गेला आणि काही दिवस सांभाळ केल्यानंतर त्याला समदौर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडे सोपवले. फाऊंडेशनने त्याला चार वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म शाळेत पाठविले. गेल्या चार वर्षांपासून तो न्यू इंग्लिश शाळेत राहत आहे. यावेळी दत्तात्रयने सांगितले, मला आईवडील आठवत नाही. माझे नातेवाईक कोण हे मला माहिती नाही आणि कुणाशीही संपर्क नाही. कधीतरी आपले नातेवाईक येतील आणि आपल्याला घेऊनजातील असे वाटत असते.
मात्र आता ते शक्य नाही. याच ठिकाणी राहून पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. दहावीत असताना कुठलीही शिकवणी लावली नाही. प्लॅटफॉर्म शाळेत राहून अभ्यास केला आणि यश मिळविले.