|| देवेश गोंडाणे

नागपूर :  एकीकडे करोना संसर्ग दूर करण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर, त्याचवेळी करोना निर्मूलनासाठी पूर्व विदर्भातील  ग्रामीण भागांमध्ये अंधश्रद्धेचा अघोरी खेळ खेळला जात आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये बकऱ्याचा बळी देत त्याचे रक्त गावाच्या सीमेवर शिंपडून गावात करोनाचा प्रवेश रोखण्याचा अजब प्रयत्न करण्यात आला.

पूर्व विदर्भातील अनेक गावांमधील लोकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता करोनाला पळवण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मंदिरात हवन, पूजन, आरती, देवीला नवस, पाणी वाहणे असे प्रकार केले जात आहेत, तर काही ठिकाणी करोनाला संतुष्ट करण्यासाठी बकरी आणि कोंबड्यांचा बळी दिला जात आहे. या क्रमात  चंद्रपूर जिल्ह्यात  काही गावांनी लोकवर्गणी करून बकऱ्यांचा बळी देण्याचा निर्णय घेतला. मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार बळी दिलेल्या  बकऱ्याचे रक्त गावाच्या सीमांवर शिंपडण्यात आले. ही बाब काही शिक्षित युवकांना कळताच त्यांनी या अघोरी प्रकाराला विरोध केला. याविरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच ग्रामसेवकांनी पुढाकार घेत हा प्रकार रोखला. नंतर याच सुज्ञ युवकांनी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी  पुढाकार घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार रोखण्यात आला असला तरी अन्य भागांमध्ये मात्र असा प्रकार सुरूच आहे.

महिलांचा मोठा सहभाग 

गावातील देवीला पहाटे पाणी वाहिले की करोना पळतो म्हणून लोक लसीकरण सोडून देवीच्या मंदिरांमध्ये रांगा लावत आहेत. काही वाजंत्रीच्या सोबतीने मिरवणूक काढून हा प्रकार केला जात आहे. यात महिलांचा मोठा सहभाग आहे.

हा फार वाईट प्रकार आहे. हे सगळे करण्यापेक्षा लोकांनी लस घ्यायला हवी. नागरिकांच्या  भावना शुद्ध असल्या तरी करोना अंधश्रद्धेने नाही तर लसीकरणानेच टाळता येणार आहे. – सदानंद बोरकर, अंधश्रद्धा निर्मूलनावरील नाट्यलेखक