नागपूर : क्षुल्लक कारणावरून मित्रांनीच एकाचे हात पाय बांधून व तोंडात बोळे कोंबून खून केल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

साहील प्रमोद तांबे (१७) रा. नाईकनगर, मानेवाडा रिंग रोड असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमित पिंगळे रा. चंद्रनगर, शुभम फुलझेले रा. बालाजीनगर, दुर्गेश ढाकणे रा. बालाजीनगर, पीयूष रा. पंचतारा बारजवळ, मानेवाडा, बिसन बालाघाटी ऊर्फ बारीक, अक्षय आणि भुऱ्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सुमित व काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत साहील हा चोरी करायचा तर सुमितविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे. साहील याच्यासोबत राहात असल्यानेच आपली मुले बिघडत असल्याचा सुमित व शुभम यांच्या आईवडिलांचा समज झाला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुमितच्या आईने साहीलला आपल्या मुलासोबत न राहण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात भांडण झाले. साहीलने सुमितच्या आईला शिवीगाळ केली होती. शुभमच्या वडिलांसोबतही त्याच कारणावरून बिनसले होते. याचा राग दोघांच्याही मनात होता. बालाजीनगर परिसरातील संत गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी साहील व आरोपींत वाद झाला. महाप्रसाद घेतल्यानंतर साहील हा गांजा पिण्याकरिता गायत्रीनगर येथील विश्वशांती गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत जाऊन बसला. आरोपींना त्याची नशा करण्याची जागा माहीत होती. आरोपी रात्री तेथे पोहोचले. त्यांनी साहीलचा गळा आवळून खून केला. शुक्रवारी सकाळी मृतदेह दिसला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले.