उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून स्पष्ट

नागपूर : करोनाची संभाव्य तिसरी लाट व विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यंदा १५ जुलैपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) परिमंडळ (सर्कल) स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील माहिती दिली.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून साडेतीन लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. त्यासाठी ३६ जिल्ह्य़ांतील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात येते. मात्र, यंदा करोनामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना अधिकाधिक परीक्षा केंद्रांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तालुका स्तरापेक्षा परिमंडळ स्तरावर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास वाचणार आहे.

औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा

राज्यात अभियांत्रिकीसाठी १,३४,३५६, औषधनिर्माणसाठी ५१,७३७, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी १,१४६, हॉटेल व्यवस्थापनासाठी १,२५२ जागा आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकी शाखेतील जागा मोठय़ा प्रमाणात रिक्त असल्याचे चित्र आहे. याउलट औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या १ लाख ३४ हजार ३५६ जागांपैकी ८० हजार जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे पन्नास हजारांवर जागा रिक्त राहिल्या होत्या.

 

करोनामुळे विद्यार्थ्यांच्या  सुरक्षेचा विचार करता राज्यभरात सर्कल स्तरावर ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुलैअखेपर्यंत ‘एमएचटी-सीईटी’परीक्षा पूर्ण करून ऑगस्टपासून प्रवेश परीक्षांनाही सुरुवात होणार आहे. – उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण