रामदास आठवलेंचा सेनेला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत जाण्याने वा संतांच्या दबावामुळे अयोध्येत राम मंदिर होणार नाही, तर ते  न्यायालयाच्या निर्णयानुसारच होईल. त्यामुळे  सर्वानी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी आणि मंदिराच्या मुद्यावर राजकारण होऊ नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आठवले नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. राम मंदिराच्या मुद्यावर प्रत्येक संघटनेला, पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घ्यावे, सभा घ्यावी मात्र कायदा हातात घेऊ नये, असेही आठवले म्हणाले. अयोध्येचा वाद न्यायालयात आहे. तेथील निर्णयानंतर /मंदिराचे काम पूर्ण होईल.

अयोध्येतील ३५ एकर जागा हिंदूंना, १५ एकर मुस्लिमांना आणि उर्वरित जागा बौद्धांना द्यावी, कारण त्याठिकाणी तिघांनाही दावा केला आहे, असा नवा फार्म्युला आठवले यांनी दिला.

२० जानेवारीला नागपूरला रिपल्बिकन पक्षाचा विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर केला जाईल. १० फेब्रुवारी २०१९ रोजी औरंगाबाद  येथे होणारा मेळावा यशस्वी करून दाखवू, असे आठवले म्हणाले. देशभरात २० कोटी एकर पडीक जमीन आहे. ती सर्व भूमिहीनांना वाटप करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.