वाहतूकदार ट्रकमालकावर संशय
सध्या सणासुदीचे दिवस असून महागाई गगनाला भिडली आहे. या डाळींचा तडका असा काही टिपेला गेला आहे की, गृहिणींचे बजेटच कोलमडले असून स्वयंपाकातून तुरीची डाळच हद्दपार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी आफ्रिकेतून नागपुरात येणाऱ्या ३५२ क्विंटल तुरीच्या डाळीचा ट्रकच लंपास करण्यात आला आहे. ही चोरी दुसऱ्या-तिसऱ्या कोणीही केली नसून या डाळीची वाहतूकदार ट्रकमालक-चालकाने केल्याची खळबळजनक माहिती आहे.

अमिनेश अशोक अग्रवाल (३३,रा. देशपांडे लेआऊट, नंदनवन) यांचे कळमना बाजारात मेसर्स नागलमल अ‍ॅण्ड सन्स हे अन्नधान्याचे घाऊक दुकान आहे. या दुकानाकरिता एक महिन्यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतून शेकडो क्विंटल तूर डाळीची ऑर्डर दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची ही पोती मुंबईतील गोदीत जमा होती. त्यानंतर ही पोती २४ ट्रकमधून नागपुरात पोहोचले तेव्हा त्यात ऑर्डरपेक्षा खूप कमी डाळ होती. त्यामुळे अमिनेश अग्रवाल यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मुंबईतील गोदीपर्यंत तूर डाळीची नोंदणी बरोबर आहे. त्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासादरम्यान ट्रकमधून तूरडाळ लंपास करण्यात आल्याचे लाक्षात आल्याने अग्रवाल यांनी कळमना पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यावर २४ ट्रक मालक व चालकांनी संगनमत करून २५ लाख ५९ हजार २७२ किमतीच्या ३५२ क्विंटल डाळीची चोरी केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. यासंदर्भात तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक यु.ए. राठोड म्हणाले की, तुरीच्या डाळीचे भाव दिवसेंदिवस वधारत आहेत. त्यामुळे ट्रकच्या चालक-मालकांनी अतिरिक्त पैसा कमविण्याच्या उद्देशाने ही चोरी केली. या प्रकरणात २ वाहनचालकांना ताब्यात घेतले आहे. २४ ट्रकपैकी काही ट्रक महाराष्ट्राच्या विविध भागासह, छत्तीसगढ, पंजाब आदी राज्याचे आहेत. त्यामुळे पुढील तपासाकरिता पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती दिली.