यवतमाळ जिल्ह्यतील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने नोव्हेंबरअखेर बुलढाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश केला होता. आता पुन्हा हा वाघ परतीच्या प्रवासाला लागला आहे. कमी कालावधीत अधिक अंतर पार करण्याची त्याची क्षमता असल्याने त्याच्या हालचालीवर वनखाते बारकाईने लक्ष ठेवून आहे.

टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने नोव्हेंबरअखेपर्यंत १३०० किलोमीटरचा प्रवास केला होता. आता त्याने सुमारे १५०० किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर पार केले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश करणाऱ्या वाघाने डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात याच अभयारण्यात मुक्काम ठोकला. त्यानंतर मात्र त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. औरंगाबाद/जालना जिल्ह्यतील अजिंठय़ाच्या टेकडय़ा आणि अजिंठय़ाच्या वनक्षेत्रात तो फिरला. डिसेंबरच्या मध्यात तो फरदापूर आणि आसपासच्या भागात वावरत होता. औरंगाबाद वनखात्यातील फरदापूरच्या समोर जाऊन सोयगाव वनपरिक्षेत्राच्या/अजिंठा परिक्षेत्राच्या जंगलात या वाघाने तिसऱ्या आठवडय़ापर्यंत भ्रमंती केली. अजिंठा लेण्यांचा भाग असलेल्या अजिंठा क्षेत्रातून तो आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. त्याच्या भ्रमंतीचा वेग पाहता त्याला सुरक्षित अधिवास प्राप्त व्हावा. तसेच त्याच्या मार्गभ्रमणात कुठल्याही प्रकारे अडथळा येऊ नये म्हणून हे सनियंत्रण विचारपूर्वक केले जात आहे. आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासात या वाघाकडून स्वत:हून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. या संपूर्ण घटनाक्रमांचे सनियंत्रण प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी.एस. हुडा तसेच भारतीय वन्यजीव संस्थेच्या चमूच्या तांत्रिक सहाय्याने स्थानिक वनाधिकाऱ्यांकडून केले जात आहे.