इतर भाज्याही कडाडल्या 

बाजारात भाज्यांच्या भावात कधीच स्थिरता दिसून येत नाही. आवक वाढली तर दर कमी आणि कमी झाली तर कर दरवाढ असे चक्र सातत्याने सुरू राहते. सध्याही मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वाधिक उच्चांक गाठला तो टोमॅटोने. दराने शंभरी गाठली असल्याने टोमॅटो सर्वसामान्यांच्या भाजीतून बाद झाला आहे, तर मिरचीतही तेजी आली असून फुलकोबी व ढेमस

चाळीस रुपये किलोने विकले जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीच्या काळात भाजीपाला महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

पावसाळा सुरू होताच जिल्ह्य़ातील बहुतांश शेतकरी नव्या पिकासाठी पेरणीला लागतो. अशात शेत रिकामे असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी होते. इतर जिल्ह्य़ातूनही भाज्या नागपूरच्या बाजारपेठेत येतात, त्याचेही प्रमाण घटलेले असते व त्या महाग असतात. त्यामुळे किंमतीत वाढ होते. यंदा सध्या टोमॅटो मागणीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी येत असल्याने शंभर ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. ही स्थिती केवळ नागपूरची नसून संपूर्ण भारतात टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. तीस ते चाळीस रुपये किलोने मिळणारे लाल टोमॅटो आता बाजारातूनही हळूहळू नाहीसे होत आहेत.

हिरवी मिरची ६० रुपये प्रतिकिलो आहेत. जिल्ह्य़ातून आवक कमी असल्याने सध्या बुलढाणा येथून मिरची नागपुरात येत आहे. फुलकोबी ४० रुपये प्रतिकिलो असून ती औरंगाबाद येथून येत आहे.

पंढरपूर येथून येणारी मेथी चाळीस रुपये किलो, ढेमस व सांबार नाशिक व नांदेड येथून येत असून तो देखील चाळीस रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे. सर्वात स्वस्त असलेली वांगी देखील ३० रुपये किलो झाली आहे.

उत्पादन  कमी झाल्याने दरवाढ

यंदा राज्यात टोमॅटोचे उत्पादन कमी झाले. नागपुरात सध्या संगमनेर, नाशिक येथून माल येत आहे. जोपर्यंत नवीन टोमॅटोचे उत्पादन बाजारात येणार नाही तोपर्यंत भाव कमी होण्याचे चिन्हे नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिने दर कमी होण्याची शक्यता नाही, असे ठोक भाजी विक्रेते राम महाजन यांनी सांगितले.