भरधाव कार पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात वर्धा येथील दोन युवा खेळाडूंचा मृत्यु झाला. शनिवारी संध्याकाळी यवतमाळ जिल्ह्यातील चापडोह पुनर्वसन येथे ही घटना घडली. जयेश प्रवीण लोहिया (१८) व अक्षद अभिषेक बैद (१८) रा.रामनगर वर्धा अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. हे दोघेही क्रिकेट खेळाडू होते. या घटनेत इतर चार जण जखमी झाले.

यवतमाळ येथे टी-२० क्रिकेट सामने सुरू आहेत. या सामन्यामध्ये वर्ध्यातील रामनगर येथील ब्रदरहूड क्रिकेट संघही या स्पर्धेत सहभागी झाला होता. सामने खेळून या चमूतील काही खेळाडू वर्धा येथे (एम.एच.३२/एएच-३७७७) या क्रमांकाच्या कारने निघाले होते. चापडोह गावाकडून बायपासने वर्धाकडे जात असताना पुलासाठी बांधलेल्या संरक्षक कठड्यावर ही कार आदळली. यात जयेश आणि अक्षद हे दोघे ठार झाले.

जयेशचे वडील प्रवीण लोहिया हे कार चालवित होते. त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षक भिंतीवर आदळली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदत करून जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा पुढील तपास अवधूतवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.