आता ऑगस्ट संपायला आला तरी विदर्भातील एकाही नदीला पूर आलेला नाही. प्रचंड पावसामुळे लहान, मोठय़ा व मध्यम धरणांमधून होणारा पाण्याचा निचराही बघायला मिळालेला नाही. दरवर्षी पुरामुळे निर्माण होणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी नेमण्यात आलेल्या आपत्ती निवारण कक्षात कमालीची शांतता आहे. या कक्षातील कर्मचाऱ्यांच्या हाताला यंदा कामच नाही. कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या चाहुलीने सारेच सध्या धास्तावले आहेत. पावसाळा कोरडा जाणे म्हणजे काय असते, याचा अनुभव विदर्भातील जनता सध्या घेत आहे. महाराष्ट्रात कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यानंतर कोकण वगळता विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस पडतो. याठिकाणी नद्यांचे जाळेही मोठे आहे. मध्य प्रदेशात अधिक पाऊस झाला तरीही इथपर्यंत पाणी येते. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या गडचिरोली जिल्ह्य़ातील नद्यांना येणाऱ्या पुरामागे मध्य प्रदेशातील पाऊस कारणीभूत आहे. यावर्षी मात्र या नद्यांमध्ये पाणीसाठा अतिशय कमी आहे. कारण मध्य प्रदेशातसुद्धा पावसाचे प्रमाण कमी आहे. या नद्यांचे काठापर्यंतसुद्धा पाणी आलेले नाही. यापूर्वी याच नद्यांमुळे आठ-आठ दिवस गावांचा संपर्क तुटल्याचे ऐकिवात आहे. वैनगंगा, वर्धा या नद्यांना दरवर्षी पूर येतो, पण यावर्षी या नद्यांमध्ये जलसाठा कमी आहे. मागील १५ दिवसांत थोडा पाऊस झाला तेव्हा या नद्यांमध्ये थोडाफार जलसाठा वाढला. गडचिरोलीतील पर्लकोटा, पामुलगौतम या नद्यांनाही पूर आलेला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील पैनगंगा या नदीला येणाऱ्या पुराचा फटका कित्येकदा जिल्ह्य़ातील नागरिकांना बसला आहे. ही नदीसुद्धा या वेळी शांत आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात इरई नदीला पूर येत नाही, पण धरणाच्या पाण्यामुळे नद्या फुगतात आणि मग पूर येतो. मात्र यावर्षी नद्यांमध्येच पाणी नसल्याने धरणे भरण्याचा प्रश्न उद्भवलेलाच नाही. अमरावती जिल्ह्य़ातून वाहणारी पूर्णा नदी अकोल्यात आणि मग अकोल्यातून बुलडाण्यात जाते. या नदीवर असणारे पूल अतिशय कमी उंचीचे आहेत. त्यामुळे थोडाही पाऊस आला तरीदेखील पूरसदृशस्थिती याठिकाणी निर्माण होते आणि वाहतूक बंद होते. मात्र या वेळी पावसाचे प्रमाणच अतिशय कमी असल्यामुळे पूरसदृश स्थितीही दिसून आली नाही. वलगावजवळील पिढी नदी, अंजनगाव सूर्जी तालुक्यातून भुलेश्वरी नदी या नद्याही पूरग्रस्त नद्या म्हणून ओळखल्या जातात. तर मोठय़ा नद्यांपैकी दर्यापूरहून वाहणारी चंद्रभागा ही मोठी नदी आहे. मोठय़ा नद्या तर दूरच राहिल्या, पण छोटय़ा नद्यांमध्येही जलसाठा अतिशय कमी आहे. शहानूर नदीला येणाऱ्या पुरामुळे कित्येकदा या धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे. या वेळी ती स्थिती उद्भवलेली नाही. २००७ मध्ये अमरावती जिल्ह्य़ाने मोठा पूर अनुभवला होता. त्या पुराचा फटका जवळजवळ १५० गावांना बसला होता. नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली होती. नागपूर जिल्ह्य़ात उद्भवणारी पूरस्थिती प्रामुख्याने मध्य प्रदेशातील संजय सागर धरणामुळे उद्भवते. या धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाणी पूर्व विदर्भात येते आणि पूरस्थिती निर्माण होते. यंदा महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशाकडेही पावसाने पाठ फिरवली. परिणामी, नागपूर जिल्ह्य़ात पूरस्थिती निर्माण करणारे हे धरण यंदा भरलेच नाही. पूर्वी जुलै-ऑगस्ट हे दोन महिने अधिक पावसाचे होते. गेल्या दोन-चार वर्षांत पावसाची पद्धती बदलली आहे. कधीतरी दोन-चार दिवस धो-धो पाऊस कोसळतो आणि मग महिनाभर गायब होतो. पाऊस सलग आणि मुसळधार आला तरच पुराची स्थिती उद्भवते. यावर्षी मुसळधारही नाही आणि सलगही पाऊस नाही. त्यामुळे पूर येणे तर दूरच, पण नद्यांच्या काठापर्यंतसुद्धा पाणी आलेले नाही. भिवापूर तालुक्यातील हत्तीनालाचा चार वर्षांपूर्वीचा प्रसंग अजूनही आठवतो. त्या वेळी मध्य प्रदेशातील संजय सागर धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे हत्तीनाल्यावर अनेक लोक अडकले. काही भिवापूरजवळ अडकले. बचावकार्य करताना त्यांना येता आले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना आणण्यासाठी बोटी घेऊन आम्ही गेलो. तेव्हा बचावासाठी ओरडणारी हीच माणसे यायला तयार नव्हती. कारण त्यांना त्यांची जनावरेही सोबत न्यायची होती आणि बोटीतून ती नेणे शक्य नव्हती. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि बचाव प्रक्रिया पार पडली, असा अनुभव माजी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ अपरुप अडावदकर यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्ह्य़ात पिली, नाग, वेणा, कन्हान, कोलार, आम, नांद, मरू, कड, कान्हा, मोहना, वर्धा, पेंच, जिवना, मदार, चंद्रभागा, वैनगंगा, सूर, जाम, लांडगी या प्रमुख नद्या आहे. भंडारा जिल्ह्य़ात वैनगंगा ही प्रमुख आणि बावनथडी, चुलबंद, कन्हान, सूर व गाढवी या उपनद्या वाहतात. चंद्रपूर जिल्ह्य़ात इरई, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या प्रमुख नद्यांना आहेत. वर्धा जिल्ह्य़ात वर्धा, धाम, बोर, भदाडी, यशोदा, वाघाडी, बाकडी, वेना, पोथरा या नद्या आहेत. गोंदिया जिल्ह्य़ात वैनगंगा, बाघ, चुलबंध, गाढवी, पांगोली या प्रमख नद्या आहेत. गडचिरोली जिल्ह्य़ाच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी आणि इंद्रावती या पाच मोठय़ा नद्या वाहतात. यवतमाळ जिल्ह्य़ात अरुणावती, पूस, पैनगंगा, बेंबळा, अडाण, वर्धा, निरगुडा, खुनी व वाघाडी या प्रमुख नद्या आहेत. बुलडाणा जिल्ह्य़ात पैनगंगा, खडकपूर्णा, नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, मन, विश्वगंगा, उतावळी, बाणगंगा, वाण आणि पूर्णा या नद्या आहेत. अमरावती जिल्ह्य़ात पेढी, पूर्णा, बेंबळा, सापन, वर्धा, चंद्रभागा, शहानूर व तापी या नद्या आहेत. वाशिम जिल्ह्य़ात पैनगंगा, काच, पूस, अरुणावती, अडाण, बेंबळा, निर्गणा, तानी, बेंडकी, काटेपूर्णा नद्या आहेत. अकोला जिल्ह्य़ात पूर्णा, काटेपूर्णा, उमा, विद्रूपा, मोर्णा, मन आणि मस या नद्या वाहतात.