नागपूर : नागपूरच्या कडक उन्हापासून थोडा दिलासा मिळावा म्हणून मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले ‘मिस्टिंग सिस्टम’ पाण्याचे हलके फवारे मारण्याऐवजी पाण्याचे थेंब प्रवाहित करीत असल्याने फलाटावर पाणी साचून प्रवासी घसरून पडत आहेत. दररम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अभियांत्रिकी खात्याला माहिती दिली असून मिस्टिंग सिस्टमची तातडीने दुरुस्ती करावी, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांना सांगण्यात आले आहे. मध्यवर्ती स्थानकावरील फलाट क्रमांक एकवर गेल्यावर्षी ‘मिस्टिंग सिस्टम’ बसवण्यात आले. या प्रणालीतून पाण्याच्या हलक्या फवाऱ्यातून वातावरणात गारवा निर्माण केला जातो. येथील उन्हाळा कडक असतो. मे आणि जूनचे तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअवर जाते. आताही सरासी ४४ तापमान सुरू आहे. उन्हाळ्यात सुटय़ात प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. शाळेच्या सुटय़ांमुळे सहकुटुंब प्रवास केला जातो. फलटावरील पंखे उष्ण हवा देतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एक ते तीन फलाटावर मिस्टिंग सिस्टीम बसवली आहे. रेल्वेगाडी फलाटावर आल्यावर ही सिस्टम सुरू करण्यात येते. गाडी गेल्यावर बंद केली जाते. गेल्या काही दिवसांपर्यंत गारावा देणाऱ्या प्रणालीतून पाण्याची गळती होऊ लागली आहे. गाडी फलाटावर आल्यावर ते प्रवाशांच्या अंगावर पाणी पडू लागले तसेच पाणी फलाटावर जमा होत आहे.तेथे टाईल्स असल्याने त्यावरून प्रवासी घसरत आहेत. गाडीत घाई-घाईत चढताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ मिस्टिंग सिस्टम’ प्रणाली फलाट क्रमांक १ ते ३ वर इटारसी आणि मुंबई कडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या पादचारी पुलांपर्यंत ही प्रणाली बसवण्यात आली आहे. शिवाय मुंबई एन्डला फलाट क्रमांकवरील नवनिर्मित प्रतीक्षालयात देखील ही सोय आहे. फलाटाच्या छतापासून काही अंतरावर एक पाईप लावण्यात आली आहे. त्यावर विशिष्ट अंतरावर सुक्ष्म छिंद्र असलेल्या तोटी (नोझल) बसवण्यात आली आहे. तेथून पाण्याचे सुक्ष्म कण हवेत पसरतात व त्यामुळे सुमारे ५ ते ६ अंश सेल्सिअसने तपामान कमी होते, असे सांगण्यात येते.सुमारे १२ लाख रुपये खर्चून ही प्रणाली बसवण्यात आली आहे. ‘मिस्टिंग सिस्टम’मुळे उष्णतेपासून दिलासा मिळतो. फलाटावर पाणी पडत असल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली असून सिस्टम तातडीने दुरुस्त केले जाईल.’’ -एस.जी. राव. सहायक वाणिज्य व्यवस्थापक