शहरालगतच्या वस्त्यांना दरडोई ७० लिटर पाणी

शहरालगतच्या टंचाईग्रस्त वस्त्यांमधील नागरिकांना दरडोई ७० लिटर्स पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नागपूर जिल्ह्य़ासह राज्यातील बारा जिल्ह्य़ात जागरित बँकेच्या सहकार्यातून पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यासंदर्भात अलीकडेच एक आदेश जारी केला असून ही योजना कशी राबवावी, यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहेत.

प्रकल्प राबविल्या जाणाऱ्या बारा जिल्ह्य़ांमध्ये नागपूर, चंद्रपूर अमरावती, बुलढाणा या विदर्भातील चार जिल्ह्य़ांसह औरंगाबाद, नांदेड या मराठवाडय़ातील, तर रायगड, रत्नागिरी या कोकणातील, अमहमदनगर, पुणे आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील, तर जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्य़ाचा समावेश आहे.

शहरालगतच्या टंचाईग्रस्त आणि दूषित पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्यांवर या योजनेतून उपाययोजना केल्या जाणार आहेत. जलस्वराज्य टप्पा दोनमध्ये या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. गावांची निवड करताना तेथील लोकसंख्या कमीतकमी २ हजार किंवा २५ हजारापेक्षा अधिक नको, गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला असेल किंवा तसा ठराव ग्रामपंचायतीने घेतला असेल तरच हे गाव या योजनेच्या निकषात बसू शके ल. गावांची निवड प्रक्रियाही सोपी नाही. अनेक समित्यांचे अहवाल आणि चाचण्यांमधून या गावांना जावे लागेल व त्यानंतरच अंतिम निवड झाल्यावर येथे योजना राबविली जाईल. ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरणामुळे शहरे फुगली असून अनेक नव्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने अशा वस्त्यांमध्ये साथीचे रोग पसरण्याचा धोका असतो, ही बाब लक्षात घेऊनच या वस्त्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.