|| अविष्कार देशमुख

स्वच्छ केल्यास टंचाईच्या काळात मदत – महापालिकेचे सफाईकडे दुर्लक्ष

कधीकाळी शहराचे वैभव असलेल्या सार्वजनिक विहिरींकडे महापालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. बहुतांश विहिरी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. उन्हाळ्यात निर्माण होणारे पाण्याचे दुर्मिक्ष लक्षात घेता या विहिरी स्वच्छ  केल्यास तेथील पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणी दिवसेंदिवस आटत आहे. पेंच नदीवर म.प्र. सरकारने धरण बांधल्यामुळे शहराला मर्यादित पाणीपुरठा होत आहे. तसेच शहारतील भूजल पातळीही कमालाची खालावली आहे. अशात यंदाच्या उन्हाळ्यात नागपूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  दुसरीकडे शहरातील  सर्वजनिक विहिरींना पाणी असून त्याचा वापर करता येणे शक्य आहे.  मात्र, त्यांना स्वच्छ करावे लागणार आहे. हे काम महापालिकेचे आहे. मात्र  त्यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.  शहरात जवळपास ५५० ते ६०० सार्वजनिक विहिरी आहेत. त्यापकी निम्म्या विहिरीत कचरा टाकला जातो. त्यामुळे त्यातील पाणी दूषित झाले आहे.

मेकोसाबाग,बेझनबाग,ताजबाग, जुनी शुक्रवारी, मंगळवारी, इतवारी, हसनबाग, मोमीनपुरा, रामनगर, तिलकनगर, खदान, बाबुळखेडा, पिवळी नदी आदी शहराच्या अनेक भागात विहिरी आहेत. या सर्व विहिरींमध्ये मुबलक पाणी आहे मात्र, कचऱ्याने तुंबलेल्या असल्याने त्याचा उपयोग नागरिकांना करता येत नाही. या विहिरी महापालिकेने स्वच्छ केल्यास त्या त्या वस्तीमधील नागरिकांना उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाण्याची मदत होईल. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसले तरी इतर कामांसाठी त्याचा उपयोग होईल.

अनेक ठिकाणी विहिरीचे कुंपण तुटलेले असल्याने वाहून जाणारे गटाराचे पाणी देखील विहिरीत जात असल्याने पाणी दूषित होत आहे. शहरात जवळपास ४० हून अधिक विहिरी अशाप्रकारच्या आहेत.

सर्वाजनिक विहिरींची संख्या

  • लक्ष्मीनगर झोन – ४०
  • धरमपेठ झोन – ५०
  • हनुमानगर झोन – ५१
  • धंतोली झोन – २३
  • नेहरूनगर झोन – ६५
  • लकडगंज झोन – १३
  • मंगळवारी झोन – ४७

नागरिकांनी विहिरीत कचरा टाकू नये. पिण्याचे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे. यावर्षी पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विहिरी साफ करण्याचे अभियान हाती घेतले असून अनेक विहिरी स्वच्छ केल्या आहेत.   – पिटू झलके, सभापती जलप्रदाय विभाग मनपा

हनुमाननगर झोन अंतर्गत ५३ सार्वजनिक विहिरी येतात. त्यापकी ४१ विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे. १२ विहिरींचे पाणी दूषित आहे. उन्हाळ्यापूर्वी आम्ही विहीर स्वच्छतेची मोहीम दरवर्षी राबवत असतो. यंदाही त्याची सुरुवात लवकरच होणार आहे.   – के.सी. हेडाऊ, उपविभागीय अभियंता, हनुमाननगर झोन मनपा