सौरभ कुलश्रेष्ठ

हिवाळी अधिवेशन आजपासून; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन शेतकरी,  स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून तापण्याचे संकेत आहेत.

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांच्या मदतीची मागणी करत सावरकरांच्या अवमानाच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. दुसरीकडे, आम्ही वचन पाळणारे लोक असून शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत भाजपच्या सावरकरप्रेमावर प्रश्न उपस्थित केले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ते एकाच आठवडय़ाचे आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करणे हा कारभाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने डिवचला गेलेला भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या अधिवेशनात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत कोंडी करण्याचे डावपेच आखत आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर करावी, महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती सरकार आहे, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

सायंकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर व सुधारित नागरिकत्व  कायद्याच्या प्रश्नावरून भाजपवर प्रतिहल्ला चढवला. सावरकरांबद्दल शिवसेनेला कायम आदरच राहील. भूमिका काल होती तीच आज व उद्याही राहील. आहे, असे ठाकरे यांनी ठणकावले.

आम्ही वचन पाळणारे लोक आहोत, असा टोला फडणवीस यांना लगावत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लवकरच चांगला निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी जाहीर केले. विरोधक स्थगिती सरकार असल्याची टीका करत आहेत. पण, प्रत्यक्षात कोणत्याही विकासकामाला स्थगिती दिलेली नाही. मेट्रो रेल्वेचे काम सुरू ठेवत केवळ कारशेडच्या कामाला स्थगिती दिली, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

शिवस्मारकाच्या कामाची चौकशी

* मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

* महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा हे निंदाजनक असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले.

* महाविकास आघाडीचे सरकार शिवाजी महाराजांचे हे भव्य स्मारक चांगल्या रीतीने उभारेल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.