नागपूर : एक वर्षांच्या चिमुकलीसह महिलेने शुक्रवारी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह सोमवारी सकाळी पाण्यात तरंगताना सापडले. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महिला व मुलीची ओळख पटली नाही. पण, रात्री उशिरापर्यंत महिला वर्धा जिल्ह्य़ातील रहिवासी असावी, अशी शक्यता आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास जगदीश खरे या युवकाला महिला व चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. त्यांनी लगेच गणेशपेठ पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांचा ताफा दाखल होताच खरे यांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेहाजवळून काही ओळखपत्र किंवा अन्य पुरावा मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, तलावाच्या काठावर महिलेच्या फक्?त चपला आढळून आल्या. महिलेचा फोटो काढून परिसरात तसेच शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. रात्री उशिरा वर्धा जिल्ह्य़ातील बेपत्ता असलेल्या महिलेशी मृतदेहाचे साम्य जुळत आहे. पण, नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतरच मृतदेहाची निश्चित ओळख समजेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येते.