नागपूर: "दुर्घटनेत घरचा कर्ता पुरुष कायमचा हरपला. अशा परिस्थितीत मुलींच्या भविष्याची चिंता सतावते. शासनाने माझ्या दोन मुलींची काळजी घ्यावी," अशी विनंती नागपूर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली. आईच्या या विनंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाची आम्ही काळजी घेऊ, शासन यापुढेही आपल्या पाठिशी असेल, असे आश्वासन दिले. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (३१ मे) शासनाने लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला होता. मंगळवारी तीन सत्रात हा कार्यक्रम झाला दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रातिनिधीक लाभार्थ्यांशी मुंबईतून ऑनलाईन लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी संगीता टिकम मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, "पती गेल्यामुळे दोन मुलींची जबाबदारी माझ्यावर आहे. शेतमजुरीतून मिळणाऱ्या मिळकतीतून उदरनिर्वाह होत नाही. शासनाने घर, निवारा व आरोग्याच्या सुविधा दिल्या. याप्रमाणे मुलींची काळजी उचलावी व मदत करावी.’ बुलडाण्यात पंतप्रधान मोदींकडून विविध लाभार्थ्यांशी संवाद केंद्रातील मोदी सरकारने ८ वर्ष पूर्ण केले आहे. या ८ वर्षाच्या काळात सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने विविध योजना केल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधून योजनेची माहिती घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं होतं. हेही वाचा : करोनामुळे आई आणि वडील दोघेही गमावले, नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या हस्ते १५ लाखांच्या मदतीचे वाटप या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस. रमामुर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये आयुष्मान भारत योजना, उज्वला योजना, मुद्रा योजना, मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान या योजनांचे लाभार्थी सहभागी झाले होते.