कोटय़वधींचा निधी खर्च करूनही पाण्याचा मन:स्ताप कायम 

अविष्कार देशमुख, नागपूर 

उन्हाळा सुरू झाला असून नागपूरकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. प्रत्येक घरी पिण्याचे पाणी पोहचावे, यासाठी राज्य शासनाने शहराला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सला (ओसीडब्ल्यू) दिले.  त्यासाठी करारानुसार सर्व निधी देण्यात आला आहे. मात्र, ओसीडब्ल्यूचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने होत असल्याने कोटय़वधींचा निधी खर्च करूनही जवळपास दीड लाख घरांना पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.

शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने राज्य सरकारने २०१२ साली चोवीस बाय सात योजना अंमलात आणण्याची घोषणा केली आणि पाणीपुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यू आणि महापालिकेला पाण्यासंदर्भातील कामे वाटून दिली. यामध्ये नव्या जलवाहिन्या, पाण्याचे मीटर बदलणे, नव्या नळ जोडणी, पाण्याच्या टाक्यांपासून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठय़ाचे नियोजन,जलशुद्धी केंद्रापासून मोठय़ा जल वाहिन्यांची दुरुस्ती आदी कामे ओसीडब्ल्यूच्या वाटय़ाला आली. पुढील पाच वर्षांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचा करार देखील झाला. मात्र मधल्या दोन वर्षांच्या कालावधीत निधीअभावी सर्व प्रकारची कामे रखडली. त्यामुळे निधी उपलब्ध झाल्यानंतर परत कामाला सुरुवात झाली. मात्र, निर्धारित पाच वर्षांत कामे पूर्ण न झाल्याने अधिक दोन वर्षांचा कालावधी वाढवून देण्यात आला. शिवाय लागणारा सर्व निधी केंद्र आणि राज्य सरकारने महापालिकेला देऊ केला. त्यामुळे आता कामाला जोरात सुरुवात करून सर्व कामे अंतिम टप्प्यात होणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीच्या  ढिसाळ नियोजनामुळे अजूनही बहुतांश भागात कामे झालेली नाहीत. ओसीडब्ल्यूला ३ लाख पंचवीस हजार घरांपर्यंत पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट हाती असताना केवळ १ लाख ७९ हजार ३२७ घरांपर्यंत ओसीडब्ल्यू पोहचला असून अजून १ लाख ४५ हजार ६७५ घरांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यास अधिक काही वर्षे नक्कीच लागत असल्यामुळे नागरिकांना ओसीडब्ल्यूच्या संथ गतीच्या कार्याचा मन:स्ताप सहन करावा लागणार आहे.

नागरिकांना यंदाच्याही उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे. तसेच शहरातील ६७६ किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याचे कार्यही ओसीडब्ल्यूकडे असून त्यापैकी ६७६ किलोमीटरचे काम झाले आहे. एकंदरीत नागपूर शहराला विविध जलस्रोतातून दररोज सुमारे ६४० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. हा पाणीपुरवठा मुबलक असल्याचे ओसीडब्ल्यूने अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, जेव्हा उर्वरित घरांना पाणीपुरवठा सुरू होताच शहराला पाण्याची गरज अधिक भासणार असून याचे नियोजन कसे करणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. शहरातील मोजक्या वस्त्यांमध्ये चोवीस बाय सातमुळे भरपूर पाणी मिळत असले तरी बहुतांश भागात ही सेवा अंमलात आलेली नाही.

मध्यंतरी दोन वर्षे निधीअभावी कामे रखडली होती. मात्र, आता कोणतीच अडचण नसून कामे जोरात सुरू आहे. शहराच्या २५२ भागात जेथे कधीच पाणी जात नव्हते, अशा ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जेथे एक दिवस आड जायचे अशा १३१ भागात दररोज पाणी मिळत आहे. प्रत्येक घरी नळ जोडणी, प्रत्येक भागात जलवाहिनी आणि त्यासोबतच अधिकृत पाण्याच्या मीटरवर जोमाने काम सुरू आहे.

– सचिव द्रवेकर, मुख्य प्रसिद्ध प्रमुख ओसीडब्ल्यू

शहराच्या प्रत्येक नव्या भागात पाणी पोहचवण्यासाठी अमृत योजना हाती घेतली असून पुढील दीड वर्षांत ही कामे पूर्ण करण्यात येतील. ही कामे ओसीडब्ल्यूला देण्यात आली नसून वेबकॉस कंपनी पूर्ण करणार आहे. १२० कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या मात्र, त्याला तोडून आता ३५ कोटींच्या निवेदा काढण्यात आल्या असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

– पिंटू झलके, सभापती जलप्रदाय विभाग मनपा