यवतमाळ जिल्ह्यासाठी नववर्ष रक्तरंजित ठरतेय. गेल्या १६ दिवसांत जिल्ह्यांत खुनांच्या १० घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर ‘क्राईम रेट’ कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दर दिवसाआड एक खून होत आहे. कळंब आणि राळेगाव तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी दोघांचा खून करण्यात आल्याने जिल्ह्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. हेही वाचा- मृत्यूचा सापळा! सूरजागड लोहखाणीतील अवजड वाहनाने घेतला आणखी एका युवकाचा बळी राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली, तर कळंब तालुक्यातही सोमवारी रात्री ८.३० वाजता इंदिरा चौकात युवकाची हत्या करण्यात आली. अशोक धनंजय अक्कलवार (६५, रा. शांतीनगर, ता. राळेगाव ) असे मृताचे नाव आहे. अक्कलवार कळमनेर शिवारातील शेतात रविवारी रात्री जागलीसाठी गेले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता त्यांचा मुलगा समीर शेतात दूध आणण्यासाठी गेला असता त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडलेले आढळले. अज्ञात मारेकऱ्यांनी दगडी वरवंटा डोक्यात घातल्याने अशोक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या वेळी जागलीकरीता शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हेही वाचा- VIDEO : ‘छोटी मधु’चे मन जिंकण्यासाठी ‘पारस’ व ‘तारू’ एकमेकांशी भिडले; पहा दोन वाघांमधील तुंबळ झटापट दुसऱ्या घटनेत कळंब येथे सोमवारी रात्री इंदिरा चौकात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अश्विन राऊत उर्फ अब्दुल (२४, रा. हलबीपुरा) याच्यावर रॉडने हल्ला करून नंतर चाकूने वार केले. यात अश्वीन गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. हल्ल्यानंतर दुचाकीस्वार तरूण पसार झालेत. दुर्दैवी बाब म्हणजे, आज मंगळवारी अश्विनचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याची हत्या झाल्याने त्याचे कुटुंबीय हादरून गेल आहेत. हेही वाचा- ‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर! अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू दर दिवसाआड एक खून जिल्ह्यात १६ दिवसांत १० खून झाल्याने गेल्यावर्षीचा रेकॉर्ड यावर्षी मोडला जाईल, अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी खुनांची शंभरी जिल्ह्यात गाठली होती. यावर्षी नववर्षाची सुरूवातच रक्तरंजित झाली आहे. सर्वाधिक खून यवतमाळ शहरात झाले आहेत. यवतमाळनजीक वाघापूर येथे पतीने दारूच्या नशेत पत्नीचा खून केला. यवतमाळात जागेच्या वादातून पुतण्याने काका व चुलत भावाची हत्या केली. गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वाच्या वादातून गेल्या आठवड्यात मांसविक्रेत्या तरूणाचा खून करण्यात आला. कळंब तालुक्यात जागलीसाठी गेलेल्या दाम्पत्यात वाद होऊन पतीने पत्नीचा खून करून मृतदेह पेटत्या शेकोटीत फेकला होता. लाडखेड पोलीस ठाण्यांतर्गत पतीने पत्नीचा खून केला. बाभूळगाव तालुक्यातील दाभा येथे सावत्र वडिलाने आठ वर्षांचा मुलास ठार मारले. सोमवारी दोन खून झाले. संशय, वर्चस्व, कौटुंबिक वाद, आदी कारणांतून खुनांच्या घटना वाढल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे