नागपूर : मोबाईल वापरावरून वडील रागवल्याने एका २० वर्षीय युवतीने आत्महत्या केली. राणी विजय वाघमारे असे या मृत युवतीचे नाव आहे. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडार मोहल्ला परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ती मोबाईलचा अतिवापर करीत असे. यावरून तिच्या पालकांनी तिला अनेकदा हटकले होते. मंगळवारी रात्री तिचे वडील हिरामण वाघमारे यांनी तिला मोबाईलच्या अतिवापरावरून परत एकदा हटकले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सगळेजण झोपी गेले.

पहाटे चारच्या सुमारास हिरामण उठले असताना राणीने स्वयंपाकघरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.