एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने चिखली आणि जाफ्राबाद (जि. जालना) तालुक्यातील २६ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. रुग्णांवर चिखली येथील चार खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हेही वाचा >>> अमरावती : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याची जमावाने केली हत्या ; अमरावती जिल्ह्यातील थरारक घटना

बाधितांमध्ये चिखली तालुक्यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी तर जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील ग्रामस्थांचा समावेश आहे. चिखली शहरातील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांची एकूण संख्या २० आहे. तायडे रुग्णालयात आमखेड येथील वंदना वाघ (४०), कमल वाघ (५५), अंबादास वाघ (४५), गोद्री येथील पांडुरंग भवर (७०), सुमन भवर (६५), पद्माबाई भवर (४०) व गायत्री भवर (२१), असे एकूण ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉ. मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटुंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप या ३ रुग्णांवर तर चिंचोले हॉस्पिटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके रा. कोळगाव, विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर रा. शिंदी हराळी व शीतल सोळंकी रा.भालगाव यांच्यावर उपचार सुरू आहेत. जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई सावळे रा. वरुड व उमाबाई वसंतराव ढोणे आणि वसंत ढोणे रा.पेठ यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

एकाच दुकानातून पुरवठा
विषबाधा झालेले रुग्ण वेगवेगळ्या गावातील असले तरी त्यांनी गावातील ज्या दुकानदारांकडून भगर व त्याच्या पिठाची खरेदी केली होती त्या दुकानदारांनी ते चिखलीतील एका व्यापाऱ्याकडून ठोक स्वरूपात खरेदी केले होते. व्यापाऱ्याला मालाचा पुरवठा नाशिक येथील एजंटमार्फत झाला होता, अशी माहिती आहे.