चंद्रपूर : देशात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय ‘स्मारक नाणे’ जारी करणार आहे. ५० वर्षे पूर्ण झाल्यावर ५० रुपयांचे स्मरणार्थी नाणे काढले जाईल.
या संदर्भात अधिसूचना जारी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, हे नाणे चतुर्थांश धातूचे आणि ४४ मिमीचे गोलाकार असेल. चतुर्थांश मिश्रधातूमध्ये चांदीचा वाटा ५० टक्के, तांबे ४० टक्के, निकेल ५ टक्के आणि जस्त ५ टक्के असेल. दातेरी कडांची संख्या २०० असेल. नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. त्यावर ‘सत्यमेव जयते’ कोरलेले असेल. त्याच्या डाव्या परिघावर देवनागरी लिपीतील ‘भारत’ हा शब्द असेल आणि उजव्या परिघावर इंग्रजीत ‘इंडिया’ हा शब्द असेल. सिंह स्तंभाखाली रुपयाचे चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये मूल्य ₹५० हे देखील असेल.
नाण्याच्या उलट बाजूच्या मध्यभागी वाघाचे चित्र असेल. चित्रासमोरील नाण्याच्या उजव्या बाजूला १९७३-२०२३ कोरलेले असेल. नाण्यावर हिंदीमध्ये ‘५० वर्षांचे प्रोजेक्ट टायगर’ आणि इंग्रजीमध्ये ‘५० वर्षांचे प्रोजेक्ट टायगर’ असे लिहिलेले असेल.
हेही वाचा – “राहुल गांधींवर लगेच कारवाई, आणि राहुल शेवाळे..”; रूपाली चाकणकर नागपुरात स्पष्टच बोलल्या
उल्लेखनीय आहे की, १ एप्रिल १९७३ रोजी केंद्र सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केला होता. सध्या देशात ५३ व्याघ्र प्रकल्प असून वाघांची संख्या सुमारे २५०० आहे. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला (तेव्हाचे उत्तर प्रदेश) देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प होण्याचा मान मिळाला होता. तर महाराष्ट्रात एकूण पाच टायगर प्रोजेक्ट असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक २०३ वाघांचे वास्तव्य आहे.