महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महावितरणने मागील काही महिन्यात राज्यातील पन्नासावर ‘मीटर रििडग एजन्सी’ची बडतर्फी केली. परंतु खासगी ‘एजन्सी’च्या वारंवार चुका पुढे येत असतानाही महावितरण स्वत:चे कर्मचारी न लावता खासगी ‘एजन्सी’चाच आग्रह का धरतात, हा प्रश्न विविध कामगार संघटनांकडून विचारला जात आहे. 

महावितरणने लघुदाब वर्गवारीतील सुमारे २ कोटी १५ लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक ‘मीटर रिडिंग’चे देयक देण्यासाठी फेब्रुवारीपासून विविध उपाय सुरू केले. परंतु या कामात हयगय केल्याचे आढळून आल्याने आजपर्यंत राज्यातील ५४ मीटर  रिडिंग एजन्सीवर बडतर्फीची कारवाई केली गेली. तीन एजन्सीची बडतर्फी मंगळवारी नागपुरातील महावितरण कार्यालयात संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या बैठकीतच झाली. यावेळीही ‘एजन्सी’च्या चुकींचा पाढा वाचला गेला. दरम्यान, महावितरणकडून सातत्याने ‘मीटर रिडिंग एजन्सी’वर होणाऱ्या कारवाईमुळे या खासगी कंपन्यांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. महावितरण मात्र आता आवश्यक उपाय केल्यामुळे कामात चांगली सुधारणा होत असल्याचा दावा करीत आहे. त्यातच महावितरणच्या कारवाईनंतर वीज क्षेत्रातील कामगार संघटनांनी खासगीकरणाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

बडतर्फ ‘एजन्सी’

जळगाव- ८

अकोला- १०

लातूर- ४

कल्याण- ५

बारामती- ४

नाशिक- ४

औरंगाबाद- १

पुणे- ३

चंद्रपूर- १

कोकण- १

अमरावती- २

कामगार संघटना काय म्हणतात?

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शंकर पहाडे म्हणाले, महावितरण स्वत: ग्राहकांकडील वीज मीटरची रिडिंग घेत असताना चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित होत होती. परंतु खासगीत तसे नाही. येथे केवळ कारवाईचा देखावा होतो. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कृष्णा भोयर म्हणाले, फेडरेशनने नेहमीच खासगीकरणाला विरोध केला आहे. ‘एजन्सी’ने योग्य काम न केल्यास त्यांचे केवळ १० टक्के पैसे कापले जातात. काहींना काळय़ा यादीत टाकले जाते. परंतु एकच ‘एजन्सी’ राज्यातील वेगवेगळय़ा भागात काम करत असल्याने एका ठिकाणी कारवाई झालेली कंपनी इतर ठिकाणी मात्र काम करताना दिसते.

महावितरण काय म्हणते?

महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला थेट प्रसिद्धीमाध्यमांशी बोलता येत नाही,  मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोला, असा सल्ला दिला. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे म्हणाले, महावितरणकडून सगळी प्रक्रिया करूनच ‘मीटर रिडिंग एजन्सी’ची नियुक्ती होते. चुकीचे काम केल्यास संबंधितांवर कारवाई होते. मात्र, त्यांनी खासगी ‘एजन्सी’लाच काम देण्याच्या विषयावर अधिक बोलणे टाळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 meter reading agencies dismiss in maharashtra zws
First published on: 07-07-2022 at 03:49 IST