“भंडारा आणि नागपूर मधील ९ ग्राम पंचायतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात   प्रवेश करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. त्यांच्या या निर्णयाने रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा पुसली गेली आहे. गावातील एका जाती पुरता मर्यादित रिपब्लिकन पक्ष आता राहिला नाही तर गावातील सर्व जाती धर्मियांचा रिपब्लिकन पक्ष झाला आहे. जातीपतीच्या भिंती ओलांडून सर्व जाती धर्मियांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतात वाढत आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला कुणी आता एका जातीपुरता मर्यादित पक्ष समजू नका हाच संदेश आज 9 ग्राम पांचयतींनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश करून दिला आहे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

नागपूर मधील मौदा येथे धनजोडे सभागृहात भंडारा आणि नागपूर मधील 9 ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व विजयी पॅनल सह सर्व सदस्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन येथील रिपाइंचे युवा नेते आशिष बुराडे यांनी केले होते. यावेळी विचारमंचावर रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुपेश थुलकर, भीमराव बनसोड, बाळू घरडे, विजय गुप्ता, राजन वाघमारे, भावेश तण्णा उपस्थित होते.

सर्वांना साथ आणि सर्वांचा विकास करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहे. गावागावाचा विकास करण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या जनधन योजना, आयुष्यमान भारत,  उज्वला योजना प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरात पोहोचवा, असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.