नागपूर : साहित्य महामंडळ व विदर्भ साहित्य संघात आधीच झालेल्या ‘सामंजस्य करारा’नुसार आगामी ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार हे आता निश्चित झाले आहे. सध्या अ .भा . मराठी साहित्य महामंडळ मुंबई घटक संस्थेकडे असून पुढील तीन वर्षांतील साहित्य संमेलने आयोजित करण्याची जबाबदारी मुंबईकडे आहे. रविवारी नागपुरात साहित्य महामंडळाची बैठक होत असून या बैठकीत वर्धेच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा मात्र मुंबईत केली जाईल, अशी माहिती आहे. महामंडळाच्या संमेलन स्थळनिवड समितीने शनिवारी वर्धा येथे भेट देऊन स्वावलंबी विद्यालयाची पाहणी केली. या निवड समितीत महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे, अध्यक्ष. डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह, प्रकाश पागे, कोषाध्यक्ष मुंबई, प्रदीप दाते, नागपूर, डॉ. रामचंद्र काळुंखे, औरंगाबाद आणि प्रकाश होळकर नाशिक या सदस्यांचा समावेश होता. ५५ वर्षांनंतर पुन्हा.. वर्धा येथे यापूर्वी १९६८ मध्ये साहित्य संमेलन झाले होते. ज्येष्ठ कवी पु. शि. रेगे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर आता ५५ वर्षांनंतर वर्ध्याला पुन्हा हा बहुमान लाभणार आहे.