१९८८ मध्ये उभारलेल्या प्रिंटिंग प्रेस व्यवसायात आठ जणांनी फसगत, विश्वासघात करून गुन्हा दाखल केला. न्यायालयात प्रकरण सुरू असताना त्या आठ जणांनी मानसिक त्रास दिला. याला कंटाळून ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे तीन चिठ्ठ्या लिहून १० ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

१९८८ मध्ये शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस व्यवहारामध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजीया, मोतीलालजी कनोजीया यांनी फसगत करून विश्वासघात केला. आर्थिक अडचणीत आणले, गुन्हेगार केले. मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मरणोपरांत न्याय द्यावा. आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये नमूद आहे. सर्वांवर कारवाई करण्यासाठी कामगार सुशीर वरघट याच्याकडून माहिती घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापक चौकशीसाठी विशेष चौकशी अधिकारी नियुक्त करावा. सर्व आर्थिक जमानतदारांवर कारवाई करावी. या सर्वांनी सहकार्य केले नाही. मात्र गुन्हेगार केले. हा अन्याय झाला म्हणून न्याय द्यावा, असे चिठ्ठीमध्ये लिहून प्रभाकर विरघट यांनी १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला होता. शेजारीच राहणारा दुसरा मुलगा अखिल याने वडिलांना चहा नाश्तासाठी फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्याने घरी येऊन पाहिले, तेव्हा त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रभाकर विरघट यांच्या खिशामध्ये तीन चिठ्ठ्या दिसून आल्या. प्रतुल विरघट यांच्या फिर्यादीवरून अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध भादंवि ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.