चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी उपसभापती ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी केली आहे. ॲड. टेमुर्डे यांच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ॲड. टेमुर्डे यांनी आपल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. दारूबंदी काळात अवैध दारूचा व्यापार, दारूबंदी उठल्यावर दारू दुकान वाढीस प्रथम प्राथमिकता, असा प्रवास खासदार धानोरकर यांचा आहे. धानोरकर यांना काँग्रेसने प्रथम उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली. पवारांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. धानोरकर लोकसभा निवडणूक जिंकले. हेही वाचा: सावधान! रानटी हत्तींचे न्यू नागझिऱ्याच्या दिशेने कूच; राष्ट्रीय महामार्गापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर मुक्काम मात्र त्यानंतर ते पूर्णतः बदलले. काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर धानोरकरांना उमेदवारी नाकारावी, असे ॲड. टेमुर्डे यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मित्रपक्षाच्या नेत्याने खा. धानोरकरांविरोधात अशी तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.