नागपूर : भारतात शहरी आणि ग्रामीण भागातील हवेच्या गुणवत्तेत ३० ते ५० टक्के प्रमाण हे घरातून होणाऱ्या प्रदूषणाचे आहे. गॅस सिलेंडर जोडणी सुरू करणे आणि त्यात पुनर्भरण करणे दिवसेंदिवस खर्चिक होत चालले आहे. त्यामुळे आजही ७८ टक्के ग्रामीण महाराष्ट्रात घरांमध्ये चुलीचा वापर होत असून इंधन म्हणून लाकूडफाटय़ाचा वापर केला जात असल्याने प्रदूषणामुळे महिलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. गरीब घरांमध्ये प्रदूषणविरहित इंधन न वापरण्यामागे प्रमुख कारण वाढत असलेल्या किमती आहे. राज्यातील ३६ टक्के घरांमध्ये गॅससिलेंडर असूनही इतर इंधनाचा वापर केला जातो. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या सहा राज्यांमधील ८६ टक्के घरांमध्ये एलपीजी जोडणी आहे. तरीही शहरातील झोपडपट्टय़ांमधील एकतृतीयांश घरांमध्ये अजूनही लाकडी सरपण, गोवऱ्या, कृषी अवशेष, केरोसीन यासारख्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या इंधनाचा वापर केला जातो. ‘वॉरिअर मॉम्स’ने आता याबाबत जनजागृतीसाठी मोहीम सुरू केली आहे. सुमारे सहा ते सात दशकांपूर्वीच स्वयंपाकघरातील धुराचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास हृदयविकारतज्ज्ञ शिवरामकृष्ण अय्यर, पद्मावती आणि एस.एन. पाठक यांनी केला होता. या अभ्यासात त्यांना घनरूप इंधनाच्या धुराच्या संपर्कात महिला बराच काळ आल्यास शरीराची प्रतिकारक्षमता कमी होणे, मासिक पाळीत अनियमितता आदी बाबी आढळून आल्या होत्या. झोपडपट्टय़ांना सर्वाधिक झळ शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्यांना या दुहेरी प्रदूषणाला सामोरे जावे लागते. एकीकडे ते राहत असलेल्या हवेत प्रदूषण असते, तर दुसरीकडे प्रदूषण निर्माण करणाऱ्या इंधनाच्या संपर्कात या महिला राहतात. विशेष म्हणजे, जगातील एकतृतीयांश लोकसंख्या म्हणजे सुमारे २.६ अब्ज लोक अजूनही लाकूडफाटा, कचरा, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या आणि केरोसीनचा वापर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून करतात. महिलांच्या आरोग्यावर परिणाम प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्या अधिक घरातून होणाऱ्या या प्रदूषणामुळे महिलांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतात. यात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्या अधिक असून मृत बालक जन्माला येणे, बाळाचे जन्मजात वजन कमी असणे, गर्भाची वाढ खुंटणे आणि कायम धुराच्या संपर्कात राहिल्यामुळे नवजात बालकांचा मृत्यू होणे या समस्यांचा समावेश आहे.