“शिवसेनेने दिलेल्या संधीवर आणि धनुष्यबाणावर निवडून आले असते तर महाराष्ट्रात शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते. जे निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्षाची मते केवळ १०-२० टक्केच असतात.”, असे विधान शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी केले. “केवळ पक्षाच्या भरवशावर निवडून आणून दाखवा.”, असे आव्हान देखील त्यांनी दिले. “शिवसेनेने संधी दिली म्हणून तुम्ही आमदार झालात”, या सातत्याने होणाऱ्या टीकेला आमदार गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “अनेक जण ३०-३५ वर्षांपासून राजकारण- समाजकारणात आहेत. पाच ते सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एक-एक लाख त्यांचे मताधिक्य आहे. त्यापैकी एकही जण आगामी काळात पडणार नाही. अजूनही आम्ही आमच्या मर्यादा सोडलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा आमच्याविषयी वाटेल ते बोलतो. आम्ही अजूनही तोंड उघडले नाही. आम्हाला त्यांची गुपिते माहीत आहेत, ते जाहीर केली तर सगळे उघडे पडतील.”, असा इशारा आ.गायकवाड यांनी ठाकरे कुटुंबीयांना दिला. …त्यांच्यासारखा मुख्यमंत्री या देशात पाहायला मिळणार नाही - “ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जमिनीवरील नेते आहेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री या देशात पाहायला मिळणार नाही. जर भाजप आणि आमची युती आहे तर दिल्लीत चर्चेसाठी जाण्यात गैर काय? चर्चा करूनच सरकार चालवावे लागते. तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींकडे जात नव्हता का? मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून टीका करतात, मागच्या सरकारमध्येसुद्धा ६२ दिवस लागली होती. ६२ दिवस आम्ही आमदार हॉटेलमध्ये बंद होतो, विसरलेत का तुम्ही?.”, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.