लोकसत्ता टीम

अमरावती : येथील बेलोरा विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होण्याच्या मार्गातील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला असून अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) परवाना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्वीट’ करून ही माहिती दिली आहे. ‘रिजनल कनेक्टिव्हीटी स्कीम’ अंतर्गत अमरावती विमानतळ आता अधिकृत परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाले आहे.

ही कामगिरी या प्रदेशासाठी वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी, आर्थिक वाढ, पर्यटन आणि विकासाच्या संधींच्या नवीन युगाची सुरुवात आहे. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीनदा सेवा देईल. आम्ही वचन दिल्याप्रमाणे, अमरावती ते मुंबई विमानसेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून येत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

अमरावती विमानतळावर नुकतीच ‘एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उड्डाण केलेल्या बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानावर भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले. या विमानाने २६/०८ धावपट्टीवरून अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि त्याचे कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे.

पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असून, अमरावतीहून लवकरच पूर्ण व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी अनेक सुरक्षाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे.

येत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी दिल्याने आता अमरावतीकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे.

Story img Loader