अमरावती : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे दंड आकारण्यास पोलिसांनी सुरुवात केली असली तर वाहनचालकांनी मात्र असा दंड भरण्याकडे पाठ फिरवली आहे. अमरावती शहरात वर्षभरात वाहनचालकांवर ८ कोटी ९१ लाखांचा दंड आकारण्यात आला होता. मात्र केवळ ८६ लाख ३४ हजार रुपयांचा दंड भरण्यात आला असून ८ कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पूर्वी पावती फाडून रोख रकमेच्या स्वरूपात दंड आकारला जात होता. त्यामुळे वाया जाणारा वेळ, भ्रष्टाचार तसेच वाद टाळण्यासाठी ई-चलन पद्धत अमलात आणण्यात आली. या पद्धतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून दंडाची रक्कम त्यांच्या मोबाइलवर आणि घराच्या पत्त्यावर पाठवली जाते.
अमरावती शहरात बेलगाम वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु, नियमबाह्य वाहतुकीचा दंड भरण्यास वाहन चालक दुर्लक्ष करीत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
८४ हजार २३९ वाहनांवर ८ कोटीचा दंड थकीत
अमरावती शहर वाहतूक शाखेच्या पूर्व व पश्चिम झोन मिळून दीडशेवर वाहतूक पोलिसांकडे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आहे. तसेच नियमबाह्य वाहतुकीवर पोलीस यंत्रणा सातत्याने लक्ष ठेऊन आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत वाहतूक विभागाने विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ९३ हजार ५४१ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामधून ८ कोटी ९१ लाख ७१ हजार ८५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी ९ हजार २५५ वाहनांच्या चालकांनी ८६ लाख ३४ हजार १५० रुपयांचा दंड भरलेला आहे. परंतु, अजूनही यामध्ये ८४ हजार २३९ वाहनांच्या चालकांनी ८ कोटी ५ लाख ३७ हजार ७०० रुपयांचा दंड भरलेला नाही.
अमरावती जिल्हा ग्रामीण भागात १ डिसेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत ई-चालान प्रकरणांमध्ये १ कोटी ७१ लाख ९१ हजार १०० रुपयांचा दंड, तर नियमीत प्रकरणांमध्ये ६१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा दंड असा एकूण २ कोटी ४४ लाख १८ हजार ६०० रुपयांच्या दंडाचा वाहन चालकांकडून भरणा करण्यात आलेला आहे. तसेच १३८ वाहनधारकांविरुध्द न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. दंड न भरणाऱ्या चालकांची वाहने न्यायालयाच्या परवानगीने जप्त करण्याची मोहीम पोलिसांनी सुरु केली आहे.