अमरावती: ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून सरकारने लावलेल्या चाळणीचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. राज्यातील तब्बल ८० लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता कायमचा बंद झाला आहे. आता अनेक जिल्ह्यांमधून लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या महिलांचे आकडे समोर येत आहेत. या आकडेवारीनुसार एकट्या अमरावती जिल्ह्यातील तब्बल १ लाख २१ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे.

लाडकी बहीण योजना कशासाठी?

लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि कुटुंबात वंचित असलेल्या स्त्रियांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना सन्मानपूर्वक जगण्यास मदत करण्यासाठी सुरु करण्यात आली होती. योजनेच्या प्रारंभी सर्व अर्जदारांना तात्पुरता लाभ देण्यात आला होता; परंतु नंतर प्रशासनाने फसवणूक आणि अपारदर्शकता दूर करण्यासाठी विस्तृत छाननी सुरू केली. तपासात काही सरकारी कर्मचारी, आर्थिकरित्या सक्षम नागरिक आणि पुरुषांनी महिलांच्या नावाने लाभ घेतल्याचे आढळल्याने या सर्वांचा लाभ आता रोखण्यात आला आहे.

‘ई-केवायसी’ साठी दिली होती मुदत

सरकारने या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिला ओळखण्याकरता सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले होते. ई-केवायसी साठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली, परंतु अखेर ३१ मार्च ही अंतिम तारीख ठेवण्यात आली. या मुदतीनंतरही दस्तऐवज सादर न करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील सुमारे १ लाख २१ हजार महिलांना योजनेतून वगळण्याचा प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे.

लाडक्या बहिणींचा लाभ का बंद झाला?

अमरावती जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ८१८ लाडक्या बहिणींचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. हा लाभ बंद का झाला? याचे कारण समोर आले आहे. यामध्ये वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहन, केवायसी त्रुटी आदी कारणांचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक महिलांनी एप्रिल अखेरपर्यंत ईकेवायसी केलीच नाही, त्यामुळेही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे.

किती लाडक्या बहिणींना लाभ मिळणार?

अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६६ हजार ८१८, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५५ हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात योजनेसाठी ७.२० लाख अर्ज मिळाले होते. त्यापैकी ६.९८ लाख महिलांना लाभ मंजूर झाला होता. यापुढेही अमरावतीमधील ६ लाख ९८ हजार लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचा लाभ सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.