‘बार्टी’च्या प्रशिक्षण केंद्रांकडून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने निवड केलेल्या (बार्टी) विविध जिल्ह्यांमधील खासगी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, अनेक खासगी संस्थांकडून येथील प्रवेशासाठी नवीन उमेदवारांना अर्ज करण्यास मज्जाव केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे जुन्याच उमेदवारांना प्रशिक्षण संधी देत त्यातून अधिकचा लाभ मिळवण्यासाठी खासगी प्रशिक्षण संस्थांचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप होत आहे.

‘बार्टी’तर्फे २०१२ पासून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एलआयसी, पोलीस आणि मिलिटरी आदी स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारीकरिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (र्कोंचग) दिले जाते. यासाठी बार्टीने ३० जिल्ह्यात ३० प्रशिक्षण केंद्रांची निवड केली आहे. या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवारांना सरुवातीला ९ डिसेंबरपर्यंत अर्जाची मुदत देण्यात आली. मात्र, अधिकाधिक उमेदवारांनी अर्ज करावा, या उद्देशाने बार्टीने २२ डिसेंबरपर्यंत मुतवाढ दिली. २६ डिसेंबरला चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, आता मुदतवाढ दिली तरी काही संस्था विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारावयास तयार नाही. यावर्षी दीड ते दोन हजार पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.  त्यामुळे महासंचालकांच्या आदेशाला संस्था चालक जुमानत नसल्याची ओरड सुरू आहे. यावर्षी विद्यार्थ्यांकडून जास्तीचे अर्ज आले आहेत. परीक्षा केंद्र मिळण्यासही अडचणी असल्याने अधिकचे अर्ज स्वीकारले जात नाही, असे काही संस्थांनी सांगितले. मात्र, या केंद्रांना बार्टीकडून लाखोंचे अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यास टाळाटाळ केली जात आहे. नवीन उमेदवारांना प्रवेश नाकारण्यासाठी असा प्रताप सुरू असल्याचा आरोप होत आहे.

सर्व प्रशिक्षण संस्थांना अर्ज स्वीकारण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. ज्या संस्था अर्ज घेण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी बार्टीशी संपर्क साधावा.

– धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी.