अमरावती : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले असले तरी पवार जेव्हा कुणाचे कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा >>> गेल्या तीन वर्षात महिला अपहरण व हरवलेल्या केसेस रिओपन करा; नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर कडू यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पवारांनी मुळात फडणवीस यांचे कौतुक केले, असे नाही. समुद्राची खोली जशी मोजता येत नाही, तसे पवारांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागू शकत नाही. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. हा चमत्कार मान्य करावा लागेल,” असे बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा >>> दोन दिवसांसाठी ईडी देण्याची संजय राऊतांची मागणी, ‘ढ टीम’ म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली खोचक टीका, म्हणाले…

तसेच, “राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी महाविकास आघाडीतील मोठ्या पक्षांचे नियोजन चुकले. अपक्ष आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा देणार होते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवे होते. बड्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय ते फुटलेच नसते. संजय राऊत यांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेल तर ते शोधले पाहिजे. या निवडणुकीत सर्वांनी आपापले पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा पराभव झाला, असेही बच्चू कडू म्हणाले.