भंडारा : जिल्ह्यातील अड्याळ परिसरात मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न समारंभात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २० वर्षीय तरूणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
वाकेश्वर येथील २० वर्षीय आरोपी आदित्य मधुकर सोनटक्के याला रावनवाडी पोलिसांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी यांची ओळख एका नातेवाईकाच्या लग्नात झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवर संवाद सुरू होऊन मैत्री झाली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये आरोपीने पीडितेला रावनवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले आणि तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. मार्च महिन्यात आरोपीने पीडितेला पुन्हा त्याच हॉटेलमध्ये नेले. आधीच ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर दबाव टाकला. पीडितेच्या इच्छेविरुद्ध जात आरोपीने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे पीडितेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.
घटनेनंतर काही काळ पीडितेने भीतीपोटी याबाबत कुणालाही माहिती दिली नाही. मात्र, सतत होणाऱ्या त्रासामुळे अखेर तिने धाडस करून ही बाब कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबीयांनी तात्काळ अड्याळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अड्याळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तसेच बालकल्याण समितीच्या अहवालाच्या आधारे अड्याळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आरोपी आदित्य सोनटक्के याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एम) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपासाची दिशा ठरवण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलिस पथकाकडून सुरू आहे.
कठोर कारवाईची मागणी
दरम्यान, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.
