नागपूर : महिलेचे लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. अवघ्या ११ महिन्यांच्या बाळाला छातीशी कवटाळून महिलेने आयुष्य कंठले. चार घरची धुणी-भांडी करुन मुलाला शिकवले. मुलाचे लग्न झाले आणि तो त्याच्या संसारात रमला. पुन्हा एकाकीपण आल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिलेला तिच्या दुःखावर फुंकर घालणारा साथिदार मिळाला. दोघेही वयाचे बंधन विसरुन एकमेकांना आधार द्यायला लागले. मात्र, आईचा मोबाईल मुलाच्या हाती लागला आणि घरातील वातावरण बिघडले. या नाजूक प्रकरणात भरोसा सेलने समूपदेशातून अलगद गुंता सोडवला.

दीपाली (काल्पनिक नाव) यांचा हुडकेश्वर परिसरात राहणाऱ्या मोहन यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. सुखी संसार सुरु असताना त्यांना मुलगा (संजू) झाला. लग्नानंतर दोनच वर्षांत मोहन यांचा आजारपणात मृत्य झाला. वयाच्या २३ व्या वर्षीच दीपाली यांच्या नशिबी विधवापण आले. मात्र, दीपाली यांनी खचून न जाता चिमुकल्या बाळाकडे बघून जीवनाचा संघर्ष सुरु केला.

सासरच्या मंडळींनी जेमतेम वर्षभर सासरी राहू दिले, त्यानंतर दीपाली यांना माहेरी परत जावे लागले. तेथून जीवनाचा खरा संघर्ष सुरु झाला. आईच्या निधनानंतर दीपाली यांनी चार घरची धुणी-भांडी करीत मुलाला मोठे केले. रात्रंदिवस काम करुन मुलाला चांगले शिक्षण दिले. मायलेकांची एकमेकांना चांगली साथ असल्याने सर्व काही सुरळीत सुरु होते. मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. त्याने वर्गमैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे आईला सांगितले. आईने मुलाला प्रेमविवाह लावून दिला. लग्नानंतर मुलाची आईबाबत माया आटली. आईला वेळ नसल्यामुळे मायलेकात दुरावा निर्माण झाला. ती सल आईच्या मनात असल्याने ती पुन्हा एकाकी पडली.

समदुःखी जोडीदाराशी मैत्री

वयाची पन्नाशी गाठलेल्या दीपाली या एकाकीपणा घालविण्यासाठी एका उद्यानात जायला लागल्या. तेथे समदुःखी असलेल्या रामकृष्ण यांच्याशी ओळख झाली. दोघांनीही एकमेकांच्या दुःखावर फुंकर घातली. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध वाढले. एकमेकांचा लळा लागला. आपापला संसार सांभाळून ते एकमेकांना साथ देत होते. अशाप्रकारे दोघांनाही एकमेकांच्या आयुष्याचा आधार मिळाला.

मोबाईलमुळे फुटले बींग

सोफ्यावर पडलेला आईचा मोबाईल सहज मुलाने हाती घेतला. त्यात रामकृष्ण नावाच्या व्यक्तीला आईने पाठवलेले काही संदेश वाचले. त्यामुळे त्याने आक्षेप घेत आईला विचारणा केली. आईने कोणतेही आढेवेढे न घेता मित्र असल्याचे सांगितले. मुलगा आणि सुनेने आक्रमक पवित्रा घेत वाद घातला. त्यामुळे हे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले.

पोलिसांनी सोडवला नाजूक गुंता

दीपाली यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांना तक्रार सांगितली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी डाकेवाड, अंमलदार रोशनी बोरकर आणि समूपदेशक समीधा इंगळे यांनी मुलगा व सुनेला बोलावले. त्या दोघांचे समूपदेशन केले. लग्नानंतर मुलाकडून दुरावा निर्माण झाल्यामुळे एकाकी पडल्याचे दुःख आईने व्यक्त केले. तर मुलानेही चूक मान्य केली. तिघांचेही समूपदेशन करण्यात आले. मुलाने आईला समजून घेतले. सून आणि मुलगा आईसह आनंदाने घराकडे परतला.