नागपूर : आरोग्यासाठी धोकादायक ठरणारा जैववैद्यकीय कचरा शहरातील रुग्णालयातून उचलण्यासाठी व्यवस्था असली तरीही अनेक रुग्णालयांमध्ये हा कचरा परिसरातच टाकला जातो. करोना काळात हा प्रकार वाढल्यावर कारवाई झाली खरी, मात्र हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही. शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्णालये व वैद्यकीय संस्था नोंदणीकृत आहेत. यात पाचपेक्षा अधिक खाटा असलेली ७५० रुग्णालये आहेत. तसेच २३१ पॅथॉलॉजी लॅब व काही खासगी रक्तपेढय़ा आहेत. जेथे-जेथे रुग्णांवर उपचार केले जातात, तेथून वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय संस्थेने महापालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. एकटय़ा मेडिकलमधूनच महिन्याकाठी पाच टनाच्या जवळपास कचरा गोळा होतो तर मेयो रुग्णालयात दरमहा सरासरी दीड हजार किलो घनकचरा तयार होतो. रुग्ण भरती असल्यास प्रत्येक खाटेमागे किमान २०० ग्रॅम घनकचरा तयार होतो. सरासरी काढली तर प्रत्येक रुग्णालयात महिन्याला सुमारे ५० ते ७० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होतो. सुपर हायजेनिक डिस्पोजल कंपनीचे कामगार रुग्णालयातून कचरा संकलन करतात. जैविक कचरा पिवळय़ा रंगाच्या पिशवीत तर लाल रंगाच्या पिशवीत प्रक्रिया करण्यासारखा कचरा गोळा केला जातो. पांढऱ्या पिशवीत धारदार, काचेचा कचरा गोळा करण्यात येतो. हा कचरा संकलित करण्यासाठी जीपीएस यंत्रणायुक्त वाहनांची सोय करण्यात आली आहे. मात्र, बरेचदा यात हयगय होत असल्याने कचरा या पिशव्यातून बाहेर पडण्याचे प्रकारही घडले आहेत. ‘लोकसत्ता’ने तीन वर्षांपूर्वी याकडे लक्ष वेधले होते. कचरा गोळा करण्यापासून तर त्याच्या विल्हेवाटीपर्यंत अतिशय जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. कारण जैवकचऱ्यातील किटाणूंमुळे फुफ्फुसांशी निगडित जंतूसंसर्गाची जोखीम वाढते. सुई, धारदार वस्तूंपासून जखम झाल्यास शरीरात विष पसरून अवयव कापण्याची वेळ देखील येऊ शकते. तसेच या कचऱ्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनेच होणे आवश्यक आहे. विल्हेवाटीकरिता भांडेवाडीत यंत्रणा जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीकरिता भांडेवाडीतच वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. याठिकाणी उच्च तापमानावर हा कचरा जाळला जातो. तो जाळताना वातावरणात विषारी वायू पसरतात आणि ते पसरू नये म्हणून आम्ही वॉटर स्प्रिंकलरचा वापर करतो, असे सुपर हायजेनिक डिस्पोजल (इंडिया) प्रा. लिमिटेडचे महाव्यवस्थापक बी.एस. अरोरा यांनी सांगितले. जैववैद्यकीय कचरा उच्च तापमानावर जाळला जात असला तरी हा परिपूर्ण पर्याय नाही. कारण त्यातून वातावरणात विषारी वायू पसरतात आणि हवा प्रदूषित होते. यातून प्रामुख्याने डायऑक्सिन्स, फ्युरान्स या विषारी घटकामुळे कर्करोगाचा धोका असतो. त्यामुळे उच्च तापमानावर कचरा जाळताना वॉटर स्प्रिंकलर हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरावे लागेल. - कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन विजिल फाऊंडेशन