नागपूर : अडीच वर्ष महाविकास आघाडीचे मोठे मंत्रिमंडळ होते आणि तेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत होत्या. मात्र त्या वेळी दखल घेतली जात नव्हती. अनेक प्रकरणाचा आजही निकाल लागलेला नाही. मात्र शिंदे सरकारमध्ये दोनच मंत्री असले तरी या सरकारने भंडाराच्या घटनेची तात्काळ दखल घेतली, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नागपुरात केला. जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना घडतात त्या वेळी सत्तेवर असलेले सरकार त्या संदर्भात काय पावले उचलते ते महत्त्वाचे आहे. आघाडी सरकारच्या काळात डझनभर मंत्री होते, मात्र त्या वेळी तेव्हा अशा घटनांबाबत कोणी बोलत नव्हते. त्या अडीच वर्षांच्या काळात हिंगणघाटमध्ये एका मुलीला जिवंत जाळण्यात आले. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तसे लिहूनही दिले होते, मात्र कारवाई झाली नाही. उद्या भाजपचे सरकार आले तरी सर्व बलात्कार बंद होतील, असे मी अजिबात म्हणत नाही. मात्र जेव्हा जेव्हा बलात्काराची गंभीर घटना घडते तेव्हा अस्तिवात असलेल्या सरकारने अशा घटनेची गंभीर दखल घेणे आवश्यक असते. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलिसांशी आणि रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधत निर्देश दिले आहेत. पटोले न्यायालयात का जात नाहीत? नाना पटोले यांची जी चित्रफीत मी ट्वीट केली होती, त्याप्रकरणी मी अजिबात मागे हटलेली नाही. त्या वेळी त्यांना मी फोन केला होता, मात्र त्यांनी बोलणे टाळले होते. माझ्या विरोधात ते न्यायालयात जाणार होते, मात्र अजूनही ते न्यायालयात गेले नाहीत. त्यांना जायचे असेल तर त्यांनी जावे, असे आव्हानही वाघ यांनी दिले.