नागपूर : महामानवाच्या जीवनचरित्रांचे आणि त्यांच्या साहित्याचे र्सवकष आणि समजपूर्वक वाचन केल्यास पुढील पिढीचे योग्यपद्धतीने प्रबोधन करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रसेनजीत गायकवाड यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेचे शहर सचिव हरिदास बेलेकर लिखित ‘मावळत्या सूर्याची सावली : माईसाहेब सविता भीमराव आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बौद्ध महासभा विदर्भ अध्यक्ष अशोक घोटेकर, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष रमा वासनिक उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध तसेच इतर महामानवांच्या जीवनचरित्र व त्यांच्या साहित्याचे समजपूर्वक वाचन झाले पाहिजे. त्यामुळे अनेक गैरसमज टाळता येतील आणि महामानवांचे विचार पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणे शक्य होईल. शारदा कबीर उपाख्य सविता भीमराव आंबेडकर या बाबासाहेबांच्या प्रति, समाजाच्याप्रति समर्पित होत्या. त्यांना समाजाने समजून न घेता विनाकारण दूषणे दिली, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी व्यक्त केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी तर आभार सोनागोते यांनी मानले.