मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवशावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केले. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला प्रबळ व्यवसाय म्हणून पहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वारंगा स्थित महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाद्वारे न्यायमूर्ती लळित यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायाधीशांच्या पत्नी अमिता लळित, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती प्रसन्ना वऱ्हाडे, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंदर कुमार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा : अकोला : आमदार मिटकरींकडून शिवा मोहोड यांना पाच कोटींच्या मानहानीची नोटीस ; राष्ट्रवादीतील वाद चिघळला

न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीश यांच्या कारकिर्दीचा व त्यांनी भूषवलेल्या विविध न्यायिक पदांचा आलेख मांडला. डॉ. विजेंदर कुमार यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळित व त्यांच्या पत्नी अमिता लळित यांचे शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीशांनी विद्यापीठाच्या शिकवणीवर्ग, वास्तूची पाहणी केली.