नागपूर: नागपूरसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात टाइम ऑफ डे मीटरच्या (टीओडी मीटर) नावावर जबरन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहे. दरम्यान येथे लावल्या जाणाऱ्या मीटरबाबत स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीने गंभीर आरोप केला आहे. त्याअंतर्गत समितीने या मीटर लावण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असलयाचा दावा करत त्यात महावितरण अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहे.
स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे मोहन शर्मा म्हणाले, पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची जबाबदारी मेसर्स माॅन्टिकार्लो कंपनीला दिली गेली आहे. या कंपनीला या भागात ३० लाखाहून जास्त मीटर बसवायचे आहे. हा कंत्राट ३ हजार ६३५ कोटी ५३ लाख रुपयांचा आहे. या कंत्राटाच्या अटीनुसार खासगी कंपनीवर मीटर लावण्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणकडून टाकण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात वेगळेच होत आहे.
समितीकडून विविध भागातून घेतलेल्या माहितीनुसार, स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत वीज ग्राहकांचा वाढता विरोध, खासगी कंपनीने नेमलेल्या कंत्राटी कामगारांना स्थानिक स्थळांची माहिती नसल्याने एका नवीन क्लृप्तीनुसार हे मीटर लावले जात आहे. त्यात महावितरणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कायम तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही या कामासाठी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत कामावर लावले जात आहे. या प्रकारामुळे ही कंपनी मीटर लावण्याच्या कामात पूर्णपने अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. या कंपनीकडून महावितरणच्या कामावर लावल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यास काही अधिकाऱ्यांना प्रति मीटर रक्कमही दिली जात असल्याचा स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे मोहन शर्मा यांचा आरोप आहे. दरम्यान या मीटरला आमचा कडाडून विरोध असून हे मीटर लावायला कुणी आल्यास ग्राहकांनी त्यांना हाकलून लावावे, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे. दरम्यान या विषयावर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलन्यास नकार दिला. काही अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर महावितरण कर्मचारी या कामात लावणे शक्य नसल्याचा दावा करत संबंधित कंपनी खासगी कंत्राटदाराच्या मदतीने हे मीटर लावत असल्याचा दावा केला. या विषयावर मेसर्स माॅन्टिकार्लो कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना हकलले
स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीच्या बैठकी कस्तूरचंद पार्क मैदान जवळच्या परवाना भवन येथे होतात. ७ मे रोजी येथे महावितरणचे दोन कर्मचारी मीटर लावण्यासाठी आले होते. परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना हाकलून लावल्याचा दावाही स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीचे मोहन शर्मा यांनी केला.