नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील नागरिकांनी ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’कडे (एचएसआरपी) पाठ फिरवल्याचे चित्र आहे. शहरातील नऊ टक्केही नागरिकांनीही या पाटीसाठी अर्ज केलेला नाही. ६ मे २०२५ पर्यंत केवळ ४७ हजार वाहनांवरच ही पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात बंधनकारक असलेल्या या पाट्या लागणार काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नागपूर जिल्ह्यात शहर, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नागपूर ग्रामीण अशी तीन आरटीओ कार्यालये आहेत. त्यापैकी नागपूर शहर आरटीओ कार्यालयाच्या (एमएच- ३१) अखत्यारित १ एप्रिल २०१९ पूर्वीची दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, जड वाहतूक करणारी वाहनांसह सगळ्याच संवर्गातील १२ लाख ५९ हजार ९३७ वाहने आहेत. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित ४ लाख ११ हजार २६५ वाहने आहेत. अशी एकूण नागपूर शहरात १६ लाख ७१ हजार २०२ वाहने आहेत.

नागपूर शहरातील या सगळ्याच सवर्गातील वाहनांना नवीन कायद्यानुसार उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बंधनकारक आहे. दरम्यान नागपूर शहर कार्यालयातील केवळ ७६ हजार ५५१ वाहनांसाठीच या पाटीचे ऑर्डर दिले गेले. त्यापैकी ४० हजार ८८२ पाटया लावण्यासाठीची वेळ वाहन धारकाला दिली गेली. २६ हजार ७९८ वाहनांना पाटी लावली गेली. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ७० हजार ६०४ वाहनांसाठी ऑर्डर दिली आहे. त्यापैकी ३३ हजार ११२ वाहनांना वेळ दिली गेली असून २० हजार ६८८ वाहनांना पाटी लागली आहे. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच या पाटीला खूप कमी प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. ही पाटी लावण्यासाठी सरकारकडून बऱ्याचदा मुदतवाढ दिली गेली. सध्या ३० जून २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत सगळ्या वाहनांना ही वाहन क्रमांक पाटी लागणार कशा? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे काय?

ही वाहनांना लावली जाणारी एक उच्च- सुरक्षा नोंदणी प्लेट आहे जी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेट केलेल्या वैशिष्ट्यांचे पालन करते. या क्रमांक पाटीला एक अद्वितीय नोंदणी क्रमांक आहे आणि ती छेडछाड- पुरावा, चोरी- प्रतिरोधक आणि टिकाऊ म्हणून डिझाइन करण्यात आली आहे.