परिवहन आयुक्तांचे पत्र धडकले; २६/११ च्या स्मृतिनिमित्त आली जाग बसमधील प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमधील सामानावर संबंधित व्यक्तीचे नाव नोंदवण्यासह त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वाहकासह चालकाची आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याच्या स्मृतिनिमित्त राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सगळ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांना तसे पत्र पाठवून याची प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता विलंबानेच का होईना परिवहन विभागाला जाग आल्याचे बोलले जात आहे. प्रवासी वाहनातून प्रवाशांव्यतिरिक्त अन्य सामान नेणे अपेक्षित नाही. सामानाचा मालक प्रवासी वाहनातून प्रवास करीत असल्यास त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित मालकाची असते, परंतु संबंधित व्यक्तीने सामानाची जबाबदारी घेतली नाही, तर गुन्ह्य़ाचा तपास करणाऱ्या यंत्रणेला चौकशीत अडथळा निर्माण होतो. हे टाळण्यासाठी प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा प्रवासात सामानाची ओळख पटविण्यासाठी प्रवाशाचे नाव व आसन क्रमांक अनिवार्यपणे प्रदर्शित करण्याची जबाबदारी वाहक, चालक आणि बसमालकाची आहे. तसेच बेवारस सामानाची जबाबदारी संबंधित वाहक, चालक आणि बस मालकाची राहील.बसमालकाने आणि चालकाने प्रवासी बसमधून सामानाची ने-आण करतांना प्रत्येक सामानाची काळजी घेऊन त्यावर प्रवाशाचे नाव, आसन क्रमांक आणि प्रवासाचा दिनांक नमूद करण्याचे आवाहन परिवहन आयुक्तांच्या सूचनेनंतर नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. या निर्णयामुळे आधीच कर्मचारी कमी असल्याच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या एस.टी.सह खाजगी कंपन्यांच्या वाहकांसह चालकांवरही आता कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे. ‘मालवाहतूक होत असल्यास तक्रार करा’ प्रत्येक प्रवाशाने आपापल्या सामानावर विशिष्ट ओळखीच्या खुणेसह स्वतचे नाव व पत्ता नोंदवण्याची गरज आहे. त्याने प्रवाशांचाच प्रवास सुरक्षित व सुखाचा होईल. वाहनमालकांनी अतिरिक्त मालाची वाहतूक अशा वाहनांमधून केल्यास तशा तक्रारी प्रादेशिक परिवहन अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना इतर प्रवाशांनी कराव्या. दोषी बस कंपन्यांसह मालकांवर योग्य कार्यवाही केली जाईल, असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले.