महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पुण्यातील कसब्यामधून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस आमदार आहेत. २०१९मध्ये मी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत ही जागा भाजपच्या खात्यात गेली. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. हेही वाचा >>> कसब्यातील पराभवावरून सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; “शिवसेनेसोबत बेईमानी केल्यानेच…” पुणे शहरातील कसबा आणि नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघांमध्ये भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत येथे कॉंग्रेस विजयी होणार आहे. कारण २०१९च्या निवडणुकीत मी फडणवीसांच्या विरोधात लढलो. तेव्हा फडणवीस १ लाखांच्या वर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. पण ते ३५ हजारांनीच निवडून आले. फडणवीस मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेसने त्यांचे मताधिक्य निश्चितच कमी केले. तेव्हा मला दक्षिण-पश्चिममध्ये काम करायला केवळ ११ दिवस मिळाले होते. २०२४साठी पक्षाने आदेश दिल्यास विजय नक्की होणार आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिमचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा देशमुख यांनी केला आहे.