अमरावती : दिवाळी सण ऐन तोंडावर आला असताना रेशन दुकानांमध्ये शिधावाटपाच्या पिशवीवर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे फोटो नाहीत म्हणून सामन्यांना दिवाळी किट पासून वंचित राहावे लागत आहे, विद्यमान सरकार केवळ राजकारणासाठी सामान्यांची भावनिक तसेच आर्थिक थट्टा करत आहे, असे आरोप काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘ राज्यातील सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली जात असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनदेखील पैसे पोहचले नाहीत. आम्ही देखील सरकारमध्ये होतो, अशी संकटे आम्ही देखील पाहिली आहेत, पण आमच्या सरकारने संवेदनशील राहून मदतीचा हात दिला. दिवंगत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा दाखला देत तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांप्रती कशाप्रकारे तत्त्परता दर्शवली याचे उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिले. फक्त ‘बोलाचीच कढी अन बोलाचाच भात’ या वृत्तीचे हे सरकार आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.