रुग्णसंख्येत किंचित घट नागपूर : गुरुवारी दोन हजाराचा टप्पा पार करणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी किंचित घट झाली असली तरी चोवीस तासात या विषाणूमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. शुक्रवारी १७३२ नवे रुग्ण आढळून आले. त्यात शहरातील १३६४ तर ग्रामीण भागातील ३०७ रुग्णांचा समावेश आहे. शहराबाहेरील रुग्णांची संख्या ६१ नोंदवण्यात आली. गुरुवारच्या तुलनेत एकूण बाधितांच्या संख्येत ३५४ ने घट झाली आहे. गुरुवारी २०८६ रुग्ण होते. शुक्रवारी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात दोन शहरातील तर एक जिल्ह्याबाहेरील आहे. शहरातील दोन मृत रुग्णापैकी एक प्रतापनगरमधील ५९ वर्षीय पुरुष असून त्यांच्यावर खासगी रुगणालयात उपचार सरू होते. दुसरी ७२ वर्षीय महिला असून ती वैशालीनगरमध्ये राहणारी आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. तिसरा मृत्यू अमरावती येथील ८० वर्षीय महिलेचा असून तिच्यावर नागपुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, चोवीस तासात एकूण ११,८४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ग्रामीणमधील २९११ तर शहरातील ८९३१ चाचण्यांचा समावेश आहे. दिवसभरात ६७२ रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णसंख्या ८६३० वर गेली आहे. प्राणवायू प्रकल्पासाठी मॉईलकडून ३.५ कोटी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या करारानुसार मॉईलने प्राणवायू निर्मिती करणाऱ्या दोन संच उभारणीसाठी ३.५ कोटी रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी विमला आर. यांना दिला. यावेळी मॉईलच्या मनुष्यबळ व्यवस्थापन संचालक उषासिंग उपस्थित होत्या. प्रस्तावित दोन संयंत्रापैकी एक सावनेर तालुक्यातील मौजा पिपळा येथे तर दुसरा उमरेड येथील एमआयडीसीच्या जागेत उभारण्यात येणार आहे. विदर्भात १७१४, गडचिरोलीत एक मृत्यू विदर्भातील इतर जिल्ह्यातही दैनंदिन रुग्णवाढ सुरूच आहे. शुक्रवारी नागपूर वगळता इतर जिल्ह्यात एकूण १७१४ नवे रुग्ण आढळले. गडचिरोलीत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यात २१८, अमरावती जिल्ह्यात २५३, यवतमाळ जिल्ह्यात १०८, भंडारा जिल्ह्यात १११, चंद्रपूर २६२, गडचिरोली १०१, गोंदिया१५०, अकोला २६०, वाशीम ४२ आणि बुलढाणा जिल्ह्यात २०९ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. वानाडोंगरी पालिकेचे २१ कर्मचारी बाधित जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. २५ जण सहलीला गेले होते. तेथून परतल्यावर काहींना लक्षणे दिसू लागली. चाचणी केल्यावर मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्यासह २१ जणांना करोना झाल्याने निदान झाले. त्यामुळे पालिकेचे कामकाजच बंद करण्यात आले आहे.