|| महेश बोकडे मुंबई, ठाणे, नागपुरात सर्वाधिक रुग्ण नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राज्यात ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण दिसत नव्हते. परंतु १ जानेवारी ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान राज्यात पुन्हा या आजाराने डोके वर काढले असून ९८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबई, ठाणे, नागपूर शहरातील असून राज्यात दोन मृत्यूही नोंदवले गेले आहेत. आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, राज्यात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक ७४ रुग्ण हे मुंबई महापालिका हद्दीत आढळले. एकूण रुग्णांतील ६६ रुग्ण हे मुंबईतील विविध खासगी रुग्णालयांत तर ८ रुग्ण कस्तुरबा आणि इतर महापालिका व शासकीय रुग्णालयांतील आहेत. ठाणे महापालिका हद्दीत या आजाराच्या ११ रुग्णांची नोंद झाली. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. कल्याण महापालिका हद्दीत या आजाराचे दोन रुग्ण आढळले. नागपूर महापालिका हद्दीत या आजाराच्या ११ रुग्णांची नोंद झाली तर एकाचा मृत्यू झाला. राज्यातील इतर जिल्ह्यांत या आजाराचा एकही रुग्ण नसल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करीत आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते २० एप्रिल २०१९ मध्ये एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला नव्हता. परंतु आता पुन्हा या आजाराचे तब्बल ११ रुग्ण केवळ नागपूर शहर हद्दीत आढळले. एकाचा मृत्यू झाल्याचेही पुढे येत आहे. या माहितीला आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.