अमरावती : देशातील केंद्रीय तपास यंत्रणांचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होत नाहीए. जे लोक गैरकारभार करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांना शिक्षा देण्याचे काम वेगवेगळ्या यंत्रणा करीत आहेत. यात राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराबद्दल पत्र लिहून विरोधकांची सुटका होणार नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत व्यक्त केले. कलवार कलाल समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी त्यांचे आज अमरावतीत आगमन झाले होते. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. हेही वाचा >>> गोंदिया: “उद्धव ठाकरेंना भीती वाटत असल्यामुळे ते आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन होणार आहेत…” भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करीत आहेत, त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांची चौकशी थांबविण्यात आली, हा आरोप खोटा आहे. विरोधकांनी तसे उदाहरण दाखवून द्यावे. कुणी भाजपामध्ये आले, म्हणून त्यांची चौकशी बंद होत नाही. कुणावर जर चुकीची कारवाई झाली, तर त्यांना न्यायालयात दाद मागता येऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशभरातील विरोधी पक्षातील ९ मोठ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले. यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सीबीआय तसेच ईडी या तपास यंत्रणांचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगत भाजपवर टीका करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नवे आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचादेखील समावेश आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपी पकडण्यात आले आहेत. संदीप देशपांडे यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत, त्याविषयी पोलीस तपास करीत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.