चंद्रपूर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी (३१ मे) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ कारु मरापे (४३) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी वनविभाग पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे.

मूल येथील हरडे यांच्या मालकीच्या शेतात रामभाऊ मरापे हे शेतमजूर म्हणून कामाला होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता रामभाऊ मरापे मशागतीसाठी शेतात जात होते. त्यावेळी शेता लगतच्या नाल्यामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनास्थळाच्या पाहणीत रामभाऊ मरापे यांनी हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. परंतु साधना अभावी त्यांना वाघाचा सामना करता आला नाही आणि ते वाघाचा बळी ठरले.

हेही वाचा : विश्लेषण : वाघ- मनुष्य संघर्षात वाढ कशामुळे?

झालेल्या हल्ल्यात रामभाऊ मरापे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असून सभोवताली घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परीसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात यापूर्वी अनेकदा वाघाच्या हल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघाच्या हल्यात आजपर्यंत परीसरात तीन व्यक्तींना आणि १० ते १२ जनावरांना जीव गमवावा लागला आहे.