ठरले तर मग. विदर्भ साहित्य संघाची आहे ती इमारत पाडून तिथे नवे संकुल उभारले जाणार. तसा मनोदय खुद्द नितीन गडकरींकडून जाहीर झालाय. गडकरींचे एक चांगले आहे. ते एखादी गोष्ट ठरवली की तडीस नेतात. नेता असाच हवा. द्रष्टा! आता प्रश्न उरतो तो संघाच्या इमारतीने एवढ्या लवकर मान का टाकली? ती जेव्हा उभी राहात होती तेव्हा संघाची सूत्रे हाती असलेल्या लोकांनी नेमके काय केले? ती उभी राहतानाच एवढी दीर्घकाळ का रेंगाळली? या इमारतीला संकुल म्हणावे की म्हणू नये असा प्रश्न वारंवार का पडतो? स्थापत्यशास्त्राचा नमुना कसा नसावा असे या इमारतीकडे बघून का वाटते? इतकी दोषपूर्ण वास्तू उभी राहात असताना त्याकडे कुणीच कसे लक्ष दिले नाही? आता काही साहित्यचिंतक म्हणतील की कशाला जुने मुद्दे उकरून काढताय? बरोबर आहे त्यांचे.
ही इमारत त्या ‘बिचाऱ्या’ विकासकासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरली. मग त्या बुजत चाललेल्या जखमेवर पुन्हा एकदा बोट कशाला? त्यापेक्षा पाडा ती व होऊ द्या नवे संकुल. सुसज्ज असे. काही हितचिंतक म्हणतात. नव्या इमारतीलाही २० वर्षे लागतील. हा निराशावाद झाला. या साऱ्यांना गडकरींच्या कामाचा झपाटा ठाऊक नाही. आधी उभारणे व मग पाडणे. पाडकाम आटोपल्यावर पुन्हा नवे उभारणे यात नवे लोकप्रतिनिधी तरबेज आहेत. त्यामुळे नव्या संकुलाची उभारणी तत्परतेने होईल व त्यात नाट्यप्रयोग लावण्याचे रंगप्रेमींचे गेल्या तीस वर्षांपासूनचे अधुरे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तर ही झाली विषयाची प्रस्तावना. आता त्याच्याशी संबंधित खरे मुद्दे, प्रश्न यावर विचार करू.
तर संघाची ही इमारत पाडून त्याला अतिभव्य संकुलाचे रूपडे देताना गिरीश गांधीच अध्यक्ष हवेत असे नेमके कुणाच्या मनात पहिल्यांदा आले? विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते किंवा या पदावर येण्याची इच्छा असलेल्यांच्या नेतृत्वात हे भरीव पाड व बांधकाम होऊच शकत नाही असा समज नेमका कुणी करून घेतला? जेव्हापासून या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून कुणाला का व कशासाठी अध्यक्ष व्हायचे आहे यावर सारस्वतांच्या वर्तुळात बरीच चर्चा रंगली. कुणी म्हणाले, येत्या काळात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय संघाकडे येणार आहे. चक्राकार गतीने फिरणाऱ्या या महामंडळाचे अध्यक्षपद जो कुणी संघाचा अध्यक्ष असेल त्याला मिळते. गांधींना नेमका हाच सुवर्णमध्य साधायचाय. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून तीन साहित्य संमेलने भरवून, गाजवून सोडायचीत. संमेलन भरवण्याचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
महामंडळाचे नेतृत्व हा मानच. त्यामुळे इतर इच्छुकांनाही तसे वाटणे काही गैर नाही. आता संकुलाचा विषय ऐरणीवर आल्यावर चर्चेचा सारा सूरच बदललाय. संकुल उभारणी होताना विश्वासातला, अंतर्गत वर्तुळातला माणूस संघाच्या अध्यक्षपदी हवा. त्यासाठी गांधी सर्वार्थाने योग्य. म्हणून त्यांचे नाव समोर करण्यात आले. आता प्रश्न असा की अशी कोट्यवधीची उलाढाल होत असताना प्रत्येकाला ‘विश्वासू’ माणूसच संस्थेत का लागतो? हे जे काही संकुल उभे राहणार आहे ते सार्वजनिक हितासाठी. म्हणजेच यात होणारी प्रत्येक उलाढाल ही सर्वांच्या संमतीने व पारदर्शक पद्धतीने होणार.
हे करताना संस्थेची विश्वासार्हता जपली जाईल याविषयीही कुणाच्या मनात काही शंका नाही. मग अध्यक्ष कुणी का असेना, काय फरक पडतो? झाशी राणी चौकात एक सुसज्ज वास्तू उभी करून शहराच्या सौंदर्यात भर घालणे हे इतिकर्तव्य पार पाडण्यासाठी अध्यक्ष अमूकच हवा हा आग्रह कोण व कशासाठी धरत आहे? मुख्य म्हणजे हे पुण्यकर्म आपल्याच नेतृत्वात व्हावे असे गांधींना का वाटते? राष्ट्रभाषा संकुलाचा कायापालट आपण करून दाखवला, आता संघाचाही करून दाखवायचा या उद्देशाने त्यांना झपाटले काय? हे खरे नसेल तर नेमके कोणते कारण खरे? नव्या चटईक्षेत्र निर्देशांकानुसार उभारल्या जाणाऱ्या संकुलातील एका गाळ्यातही आपल्याला रस नाही, सारे काही पारदर्शकपणे व्हावे ही गांधींची इच्छा जरूर असेल असे गृहीत धरू. मग दातेंची हीच इच्छा का असू शकत नाही? माणूस बदलला की सरकारचा, विकासकाचा दृष्टिकोन बदलतो की काय? संस्था मोठी की ती चालवणारी व्यक्ती मोठी याचे उत्तर संस्था हेच असायला हवे. तरीही अमूक एका व्यक्तीच्या नावाचा आग्रह कशासाठी? जुनी इमारत पाडण्याच्या आधी त्यातील भाडेकरूंना वेगवेगळे करार करत बाहेर काढणे, हे करताना वाद, कोर्टकज्जे झाले तर ते सोडवणे. यात फक्त गांधीच तरबेज, इतर कुणी नाही असा समज कुणी करून घेतला?
हा संघ नागपूर तसेच विदर्भाच्या वैभवात भर घालणारा असेल तर त्याचा अध्यक्ष कुणी का असेना, त्याच्या विकासासाठी साऱ्यांनी पावले उचलायला हवीत. शेवटी संस्था महत्त्वाची. मग गिरीश गांधींना पुढाकार घ्यायला कुणी लावले? आता माझ्या निवृत्तीची वेळ आली असे अलीकडे सतत म्हणणाऱ्या गांधींमध्ये निवडणूक लढण्यासाठी अचानक हत्तीचे बळ कुठून संचारले? गिरीशभाऊंचे म्हणाल तर ते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून साहित्यिकांना पुरस्काराच्या माध्यमातून उपकृत करतच आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा झपाटा विदर्भ साहित्य संघालाही लाजवेल असा. अलीकडे ते संस्थात्मक पाशातून एकेक करून मोकळे करत असताना त्यांना अचानक लढण्याची प्रेरणा कुठून मिळाली? किंवा ती त्यांच्यात जागृत करण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? ही अदृश्य शक्ती नेमकी गांधींच्याच मागे का उभी ठाकते? इतरांच्या का नाही? साहित्यसेवा आणि साहित्य व्यवहार या दोन शब्दांभोवती कुठल्याही साहित्यसंस्थेचे कार्य फिरते. हा सर्वमान्य ठरलेला प्रकार.
कोणत्याही संस्थेला समोर जायचे असेल तर सेवा व व्यवहारातला समतोल साधावा लागतो. वि.सा. संघाचीही वाटचाल आजवर अशीच राहिली. आता मात्र हा संघ साहित्यबाह्य कारणामुळे चर्चेत आलाय. त्याला निमित्त ठरले ही होणारी निवडणूक. हा संघ जास्तीत जास्त उपक्रमशील व्हावा, त्यात साहित्यातील वेगवेगळ्या प्रवाहांना स्थान मिळावे, त्याचे स्वरूप सर्वसमावेशक असावे, कुणा एका विचाराची मक्तेदारी त्यावर नसावी या अपेक्षेत सारे असताना अचानक हा संकुलाचा विषय ऐरणीवर आला व कोण कशासाठी पुढाकार घेतो हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले. याला दुर्दैव नाही तर आणखी काय म्हणायचे? संघाची स्वतंत्र इमारत तसेच संकुल असावे. यातून तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा ही अपेक्षा गैर नाही. मात्र यातून कुणाचे तरी आर्थिक हित साधले जाणे हे मात्र गैर. तसे घडू नये अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे? ती पूर्ण झाली तरी ठीक आणि नाही झाली तरी ठीक. शेवटी बोरूबहाद्दराच्या हाती लिहिण्यापलीकडे असतेच काय?

