नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. या मुद्यावरून महाविकास आघाडीने एकनाथ शिंदेंविरोधात विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीही काल ( २० डिसेंबर ) एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जेव्हा न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाबा गंभीर आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे. सरकार बदलल तेव्हा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढावी, असे म्हणणारे उद्धव ठाकरे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत आली, तेव्हा महाराष्ट्राच्या जननेते मतदान केलं नव्हतं. मग ते राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले होते का?," असा खोचक सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे. हेही वाचा : “बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं टीकास्र; शिंदे-फडणवीसांना केलं लक्ष्य! "उद्धव ठाकरे विधिमंडळात आल्यावर त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात जायला पाहिजे होतं. पण, थेट काँग्रेसच्या कार्यालयात गेले. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही काँग्रेसच्या कार्यालयात पाय सुद्धा ठेवला नसता. शेवटी पक्ष विचारधारेवर चालत असतात. एकमेकांशी संबंध कसे आहे, यावर चालत नाही. कालचा ग्रामपंचायतीचा निकाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. जनतेच्या विकासाची कामे केली, जनता सुद्धा तुमच्याबरोबर राहते," असा टोला केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. हेही वाचा : “मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता”, अमृता फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, “मी यावर…!” "आम्ही शांतपणे काम करतोय, करुद्या. अन्यथा अशी कितीतरी प्रकरणे काढता येतील. मग लोक म्हणतील, अशा प्रकारची चिखलफेक राजकारणात सुरु आहे. आम्ही शेवटी मान ठेवतो. मान घेतला सुद्धा पाहिजे. ज्या घोषणा दिल्या जातात, त्याच्यापेक्षा वाईट त्यांच्याबद्दल दिल्या जातील. पण, तसे आम्ही करणार नाही," असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं.